येस न्युज मराठी नेटवर्क : महाराष्ट्राचा पॅरा जलतरणपटू सुयश नारायण जाधव याने टोकियो पॅरालिम्पिक पात्रता फेरीत प्रवेश करत मोठा विक्रम रचला आहे. यासह तो पॅरालिम्पिक स्पर्धेचे तिकीट मिळवणारा पहिलाच भारतीय जलतरणपटू ठरला. आतापर्यंत देशातील कोणत्याही जलतरणपटूने ऑलिम्पिक किंवा पॅरालिम्पिकसाठी पात्रता मिळविली नव्हती.
सुयश जाधव हा सोलापुर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील रहिवासी आहे.सुयश आता टोकियो येथील स्पर्धेत ५० मीटरच्या एस-७ वर्गात आणि २०० मीटरच्या वैयक्तिक मेडलीच्या एसएम-७ वर्गात सहभाग घेणार आहे. २०१८ साली जकार्तामध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेतील प्रदर्शनाच्या जोरावर त्याने पात्रता फेरीत धडक दिली.
५० मीटर बटरफ्लाय फेरीचा टप्पा पार करण्यासाठी त्याला ०.३२.९० सेकंदाचा कालावधी देण्यात आला होता. यावेळी त्याने अवघ्या ०.३२.७१ सेकंदात ही फेरी पूर्ण करत सुवर्णपदक जिंकले होते. तर, २०० मीटर मेडली फेरी पूर्ण करण्यासाठी २.५७.०९ सेकंदाचा अवधी होता आणि त्याने २.५६.५१ सेकंदात ही फेरी पार करत कांस्य पदक जिंकले होते. तो सध्या बालेवाडीच्या साई केंद्रात सराव करत आहे. पॅरालिम्पिक स्पर्धा २४ ऑगस्ट २०२१ ते ५ सप्टेंबर २०२१या काळात टोकियोमध्ये होणार आहेत.
लहानपणीच दोन्ही हात गमावलेल्या सुयशने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही स्तरावर १२५ पदके मिळवली आहेत. घराच्या गच्चीवर पतंग उडवताना सुयशला विद्युत तारेला स्पर्श झाला होता. या घटनेनंतर, काळे पडलेले दोन्ही हात कापावे लागतील, असे मुंबईतील डॉक्टरांनी सांगितले. या सल्ल्यामुळे सुयशचे वडील नारायण जाधव व आई सविता जाधव यांच्या पायाखालची जमीन सरकली. मात्र, त्यांनी जिद्द सोडली नाही. सुयशला वाचवण्यासाठी त्यांनी ‘कठीण’ निर्णय घेतला. दोन्ही हात अर्धे कापल्यानंतरही सुयशचे आंतराष्ट्रीय खेळाडू बनवण्याचे स्वप्न हवेत विरले नाही. दोन्ही हाताने अपंग असतानाही सुयशला जलतरण स्पर्धेसाठी तयार करण्यात आले. त्याने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव गाजवले.
