सोलापूर – भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) यांच्या वतीने १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त भव्य मानवंदना रॅली मोठ्या उत्साहात आणि जोशात काढण्यात आली. रॅलीची सुरुवात दत्तनगर येथील लालबावटा कार्यालयात डॉ. अशोक ढवळे यांच्या हस्ते, ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ नरसय्या आडम मास्तर यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून करण्यात आली.
यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी लाल रंगाचे शर्ट परिधान करून लाल झेंडे, निळे झेंडे आणि तिरंगा ध्वज हातात घेत उत्साहपूर्ण वातावरणात रॅली काढली. ही रॅली दत्तनगर लालबावटा कार्यालयातून तानाबाना चौक, विववो प्रोसेस, रंगभवन मार्ग, हरीभाई देवकरण प्रशाला मार्गे डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे पोहोचली. तेथे रॅलीचा समारोप करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.
यावेळी “मनुस्मृती मुर्दाबाद”, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो”, “लोकशाहीचा विजय असो”, “संविधान की रक्षा कौन करेगा – हम करेंगे”, “आरएसएस हो बरबाद”, “लोकशाही जिंदाबाद”, “संविधान जिंदाबाद” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
दरम्यान, पक्षाच्या वतीने “भव्य लाल सैनिक तरुणांची मानवंदना रॅली” देखील उत्साहात पार पडली. या रॅलीची सुरुवात पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. युसुफ शेख (मेजर) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
यावेळी पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ. एम. एच. शेख, नसीमा शेख, शेवंता देशमुख (सातखेड), ॲड.अनिल वासम, शकुंतला पाणीभाते, अशोक बल्ला, दीपक निकंबे, अखिल शेख, दाऊद शेख, नरेश दुगाणे, विक्रम कलबुर्गी, विल्यम ससाणे, बापू साबळे, बाबू कोकणे, मल्लेशम कारमपुरी, वीरेंद्र पद्मा, बाळकृष्ण मल्याळ, विजय हारसुरे, रफिक काझी हसन शेख, शहाबुद्दीन शेख, अमित मंचले, बालाजी तुम्मा, आसिफ पठाण आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
या भव्य रॅलीमुळे संपूर्ण परिसर लाल सलामच्या घोषणांनी दणाणून गेला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले.

