सोलापूर- बनावट दस्तावेज केल्याप्रकरणी तत्कालीन तलाठी मुकुंद रामचंद्र राजूपाध्याय यास कोल्हापूर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मेहरोझ पठाण यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला.
या हकीकत अशी की, करमाळा येथील शेती गट नंबर ३९४ हा खरेदी दस्त क्र. २४१०/२००७ अन्वये तत्कालीन दुय्यम निबंधक यांनी नोंदविला होता. सदरदस्ता हा शोभा खुळे यांनी लिहून घेतला होता, तर सुमतीबाई गायकवाड, पुरुषोत्तम गायकवाड, रजनीकांत गायकवाड, संजय गायकवाड या लोकांनी सदर दस्त लिहून दिला होता. सदर गटाच्या सातबारा उताऱ्यावर रमेश गायकवाड, वत्सलाबाई सोनवणे, चंद्रलीला साळवे ये जिवंत असताना देखील ते मागील 10 ते 15 वर्षांपूर्वी मयत झाल्याचे दाखवून तत्कालीन तलाठी मुकुंद रामचंद्र राजूपाध्याय यांच्याकडून बनावट सातबारा उतारा तयार करून खोटा खरेदी दस्त तयार केला. अशा आशयाची फिर्याद सहाय्यक निबंधक अरविंद सूर्यकांत कोकाटे यांनी करमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
त्यावरून आपणासा अटक होऊ नये म्हणून तलाठी मुकुंद राजूपाध्याय यांनी बार्शी येथील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनाचा अर्ज दाखल केला होता. तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता.
त्यावर तलाठी मुकुंद राजूपाध्याय यांनी ऍड रितेश थोबडे यांच्यामार्फत कोल्हापूर येथील उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनाचा अर्ज दाखल केला होता.
अर्जाच्या सुनावणीच्या वेळी ऍड रितेश थोबडे यांनी आपले युक्तिवादात अर्जदाराचा गुन्ह्यातील सहभाग हा मर्यादित स्वरूपाचा आहे, त्यामुळे त्यास कोठडीची आवश्यकता नाही, असा युक्तिवाद मांडला त्यावरून न्यायमूर्तीने रक्कम रुपये 50,000/- रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला.
यात अर्जदार आरोपीतर्फे ॲड रितेश थोबडे, ॲड निखिल पाटील तर सरकारतर्फे ॲड. आश्विनी टकळकर यांनी काम पाहिले.











