सोलापूर शहर आणि जिल्ह्यात पावसाचा पत्ता नाही. नुसते वारे वाहत असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. असे असले तरी एक दिलासा देणारी बातमी असून सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी समजले जाणारे उजनी धरण आज संध्याकाळपर्यंत शंभर टक्के भरणार आहे. आज सकाळी नऊच्या आकडेवारीनुसार दौंड मधून उजनी धरणात 70,989 क्युसेक पाणी येत आहे. सध्या धरण 93.44% भरले आहे. 117 टीएमसी एवढे पाणी साठल्यानंतर धरण 100% भरते. सध्या 113.72 टीएमसी एवढे पाणी साठले आहे. दर तीन तासांनी एक टीएमसी पाणी वाढू लागली आहे. त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत उजनी धरण 100% भरणार आहे. उजनी धरणात 123 टीएमसी एवढे पाणी साठवले जाऊ शकते त्यावेळी त्याची टक्केवारी 111 टक्के असते. आणखी तीन चार दिवस भीमा खोऱ्यात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे त्यामुळे उजनी धरण भरल्यानंतर जिल्ह्यात पाऊस नसताना भीमा नदीला पूर येईल की काय अशी शक्यता वर्तवली जात आहे. सध्या वीर धरणातून नीरा नदीत पंचवीस हजार क्युसेक पाण्याचा प्रवाह सुरू असून हे पाणी चंद्रभागा नदीत पोहोचल्यामुळे जुना दगडी पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे. उजनी धरण 100% भरले तरीही काही आमदार पाण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे जास्त वशिला लावतात त्यामुळे समन्यायी पद्धतीने पाण्याचे वाटप आणि नियोजन करणे गरजेचे आहे.








