जिल्ह्यातील मतदारांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याला सहकार्य करावे -जिल्हा निवडणूक अधिकारी मिलिंद शंभरकर

0
38

सोलापूर :- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि भारत निवडणूक आयोगाच्या संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत सोलापूर जिल्ह्यात 21 जुलै ते 21 ऑगस्ट 2023 या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ घरोघरी भेट देऊन मतदारांची पडताळणी करणार आहेत. तरी जिल्ह्यातील सर्व सुज्ञ मतदारांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले

21 जुलै ते 21 ऑगस्ट 2023 या संपूर्ण महिनाभराच्या काळात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी प्रत्येक मतदारांच्या घरी भेटी देतील. आपल्या या भेटीमध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदारांचे वैयक्तीक तपशील, पत्ता आणि छायाचित्रांची पडताळणी करतील, मयत आणि स्थालांतरीत मतदार, दुबार नोंदणी असलेले मतदार, मतदारांचाही शोध घेतील तसेच मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड जोडण्याची प्रक्रिया करतील. यासोबतच नव मतदार, तृतीयपंथी आणि भटक्या विमुक्त जाती जमातीतील मतदार, देहव्यवसाय करणाऱ्या महिला मतदारांचा शोध घेऊन त्यांची तसेच मतदार यादीत नाव नसलेल्यांचा शोध घेऊन त्यांची नोंदणी करण्याचं कामही या काळात केलं जाणार आहे, श्री. शंभरकर यांनी सांगितले.

या उपक्रमामुळे सोलापूर जिल्हयातील मतदार याद्यांच्या शुध्दीकरणाचं आणि अद्ययावतीकरणाचं काम सुलभ होऊ शकणार आहे. तसेच हा उपक्रम म्हणजे आपण आपल्या मताधिकारापासून वंचित राहू नये याची सुनिश्चिती करण्याची नागरिकांसाठीची मोठी संधी असल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली. त्यामुळेच जेंव्हा हे अधिकारी आपल्या घरी येतील तेव्हा नागरिकांनी आपलं स्वतःचं तसंच आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची नावं मतदार यादीत आहेत की नाहीत हे तपासून घ्यावं, ज्यांनी वयाची 18 वर्ष पूर्ण केली आहेत पण अजूनही मतदार नोंदणी केलेली नाही अशांची मतदार नोंदणी करुन घ्यावी, मतदार यादीतील आपले वैयक्तीक तपशील, पत्ता यात काही दुरुस्त्या असतील तर त्यासाठीचे अर्ज भरुन द्यावेत, लग्नानंतर नाव बदलेल्या स्त्री मतदारांनी आपली नांव बदलून घ्यावीत, स्थलांतरीत झालेल्यांनी नव्या पत्याची नोंद करुन घ्यावी असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.

मतदारांच्या सहकार्यामुळेच हा उपक्रम यशस्वी होणार असल्यानं जिल्ह्यातील सर्व मतदारांनी त्यांच्या घरी येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.