आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मतदारांच्या डोक्याचा अक्षरशः केमिकल लोच्या होणार आहे. कोण – कोणाशी हात मिळवणी करतोय आणि कधी कोणाचं शत्रुत्व संपवून मनोमिलन होतंय हे काहीच कळायला भाग नाही. महायुती आणि आघाडी होणार नसल्यामुळे प्रत्येकाने स्वतंत्र लढण्यासाठी दंड थोपटले आहेत. आपली ताकद दाखवण्यासाठी जो तो वेगवेगळे फंडे राबवू लागला आहे. मुंबईत दोनही ठाकरे एकत्र आले. अधून मधून शिंदे सेना आणि ठाकरेसेना एकत्र येणार अशी चर्चा सुरू असते. आता तर दोनही राष्ट्रवादी म्हणजेच थोरले पवार आणि धाकले पवार यांचे मनोमिलन होणार.. अशा बातम्या सुरू झाल्या आहेत.
जमीन घोटाळ्याप्रकरणी पार्थ पवार यांनी अजित पवार यांना चांगलेच अडचणीत आणले असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे ‘काका मला वाचवा’.. ही म्हणण्याची वेळ आता अजितदादांवर आली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये भाजप स्वतंत्र लढणार आहे तर दुसरीकडे दोनही राष्ट्रवादी एकत्र येऊन या निवडणुका लढणार आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये घटक पक्ष असलेले अजित दादांचे घड्याळ भाजपला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत चॅलेंज देणार आहे. त्यामुळे आणखी खूप मोठ्या प्रमाणावर राजकीय उलथा-पालथ होणार आहे असेच दिसते.

