पुणे- संत श्री ज्ञानेश्वर महाराज व संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्या ९ जुलै रोजी पुणे शहरात एकत्रित येणार असून, १० जुलै रोजी मुक्काम आणि ११ जुलै रोजी पुणे शहराबाहेर प्रस्थान करणार आहेत. पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने वारकरी पायी सहभागी होत असल्याने वाहतूक सुरक्षित, सुरळीत व नियोजनबद्ध राहावी यासाठी पुणे शहरात विशेष वाहतूक व्यवस्थापन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार मोटार वाहन कायद्यातील तरतुदींचा वापर करून पोलीस उपआयुक्त (वाहतूक) डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी ९ जुलै रोजी पहाटे ००.०१ वाजल्यापासून ते ११ जुलै २०२६ रोजी रात्री २४ वाजेपर्यंत पालखी मार्ग व परिसरातील वाहतुकीत तात्पुरते बदल लागू केले आहेत. अत्यावश्यक सेवेतील वाहने (अग्निशमन दल, पोलीस, रुग्णवाहिका, पेट्रोल-डिझेल वाहतूक करणारी वाहने, लग्नसमारंभाची वाहने आदी) या निर्बंधातून वगळण्यात आली आहेत.
समर्थ वाहतूक विभागांतर्गत खालील मार्गांवर सर्व प्रकारच्या वाहनांच्या प्रवेशास मनाई करण्यात आली आहे
इनामदार चौक, समाधान चौक, नाना चावडी व चाचा हलवाई चौकाकडुन अरुणा चौककडे सर्व प्रकारची वाहने घेऊन जाणेस मनाई करण्यात येत आहे. मनुषा मस्जिद चौककडून पारशी अग्यारी चौकाकडे वाहने घेऊन जाण्यास मनाई करण्यात येत आहे. पारशी आग्यारी चौक व संतकबिर चौकाकडून अरुणा चौकाकडे सर्व प्रकारची वाहने घेवुन जाण्यास मनाई करण्यात येत आहे. अशोक चौक, अनमोल ट्रेडर्स, डावरे चौक, वटेश्वर भवन, मारुती मंदिर, रामोशी गेट, खासकर मस्जिद चौक, चमडे गल्ली चौक व ए.डी. कॅम्प चौकाकडुन पालखी विठोबा चौकाकडे सर्व प्रकारची वाहने घेऊन जाणेस मनाई करण्यात येत आहे.
वाहतूक बदलांबाबत अधिक माहितीसाठी नागरिकांनी वाहतूक मुख्य नियंत्रण कक्ष, पुणे येथे दूरध्वनी क्रमांक ०२०-२६६८५००० किंवा ०२०-२६६८४००० वर संपर्क साधावा, असे आवाहन पुणे शहर वाहतूक शाखेने केले आहे.










