सोलापूर : सोलापूर शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करून नागरिकांना सुरक्षित, सुलभ आणि गतिमान वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्रस्तावित उड्डाणपूल प्रकल्पाला आज मोठी गती मिळाली. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या निर्देशानुसार उड्डाणपूल प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या खाजगी व राज्य शासनाच्या जागेचे नॅशनल हायवे कडे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
आज पंढरपूर येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते या प्रक्रियेचा औपचारिक समारंभ पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी एन. कार्तिकेयन यांनी संबंधित जागेच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करून आवश्यक कागदपत्रे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केली. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पालकमंत्री मा.जयकुमार गोरे, शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे, सोलापूर महानगरपालिकेचे महापौर विनायक कोंड्याल तसेच महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे नॅशनल हायवेचे स्वप्निल कासार, संतोष देशमुख यांच्याकडे हस्तांतरणाची कागदपत्रे सुपूर्द केली.
यापूर्वी ३ ऑगस्टपर्यंत उड्डाणपूल प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, त्या प्रक्रियेसाठी खाजगी व राज्य शासनाच्या मालकीच्या जागेचे हस्तांतरण २५ जुलै पूर्वी पूर्ण होणे आवश्यक होते.मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी एन. कार्तिकेयन यांनी आवश्यक कार्यवाहीला गती देत जागा हस्तांतरणाची प्रक्रिया सुमारे ९३ टक्के पूर्ण करून अंतिम टप्प्यात आणली. आज मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत हस्तांतरणाची औपचारिक प्रक्रिया पूर्ण झाल्याने प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचा प्रशासकीय अडथळा दूर झाला आहे.या निर्णयामुळे ३ ऑगस्ट रोजी पुन्हा नव्याने टेंडर काढण्याची आवश्यकता राहणार नाही. जागा हस्तांतरणाची प्रक्रिया वेळेत पूर्ण झाल्याने सध्या सुरू असलेली निविदा प्रक्रिया अखंडितपणे पुढे सुरू राहणार असून,त्यामुळे उड्डाणपूल प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच प्रारंभ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.या महत्त्वपूर्ण प्रसंगी पालकमंत्री मा.जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे, सोलापूर महानगरपालिकेचे महापौर विनायक कोंड्याल, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, सभागृह नेते नरेंद्रजी काळे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.उड्डाणपूल प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या राज्य शासनाच्या जागा महानगरपालिकेच्या ताब्यात आल्यामुळे प्रकल्पाच्या प्रशासकीय, तांत्रिक व कायदेशीर प्रक्रियेला मोठी गती मिळाली आहे. निविदा प्रक्रिया वेळेत पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष बांधकामास प्रारंभ होणार असून, या प्रकल्पामुळे सोलापूर शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल. नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि सुलभ होण्याबरोबरच इंधनाची बचत, वायू प्रदूषणात घट, अपघातांचे प्रमाण कमी होणे तसेच शहराच्या आर्थिक व पायाभूत विकासाला मोठी चालना मिळणार आहे.राज्य शासन, जिल्हा प्रशासन आणि सोलापूर महानगरपालिका यांच्या समन्वयातून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची पुढील कार्यवाही वेगाने राबविण्यात येणार असून, मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरच्या विकासाच्या दिशेने उड्डाणपूल प्रकल्प हा एक ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले










