तब्बल दीड वर्षानंतर अखेर महाराष्ट्रातील जनतेला मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेता येणार आहे. राज्य सरकारने कोरोनाचे सर्व नियम पाळून आज नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 7 ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व मंदिरं खुले करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आज पहाटेच राज्यातील सर्व प्रसिद्ध मंदिरांची दारं भाविकांसाठी खुली करण्यात आली आहे.
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या माहूर येथील रेणुका देवी मंदिर आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशी भक्तांसाठी खुलं करण्यात आले आहे.पहाटेपासूनच माहूर गडावर मोठ्या प्रमाणावर भक्तांनी गर्दी केलीय.मंदिर प्रशासनाकडून भक्तांना विना मास्क परवानगी दिली जात नसून कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. नवरात्री निमित्त मंदिर आणि परिसरात फुलांची सजावट करण्यात आली आहे.
आज शारदीय नवरात्राला सुरुवात होत असताना गेल्या सहा महिन्यापासून बंद असलेली राज्यातील मंदिरे खुली होत असून घटस्थापनेच्या या शुभमुहूर्तावर विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे . पुणे येथील विठ्ठल भक्त राम जांभुळकर यांनी ही फुलांची सेवा दिली असून आजच्या सजावटीसाठी विविध प्रकारच्या जवळपास अडीच टन फुलांचा आणि तुळशीपत्राचा वापर केला आहे . यामध्ये लक्षावधी तुळशीच्या पानांसह झेंडू , गुलाब, अष्टर , शेवंती , जरबेरा , कागडा , कामिनी , ग्लॅडीओ या फुलांचा वापर करण्यात आला आहे . विठुरायाचा गाभारा त्याच्या लाडक्या तुळशीपत्राने भरून गेला असून रुक्मिणी मातेच्या मागे शेवंतीच्या फुलाचे पडदे करण्यात आले आहेत .
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर पहाटे पाच वाजता भाविकांसाठी खुले करण्यात आले असून दर्शनासाठी गणेशभक्तांनी रांगा लावल्या आहेत.दगडूशेठ मंदिरावर फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे.श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात राज्यमंत्री दत्ता भरणे यांच्या हस्ते आरती करण्यात आली.राज्य सरकारने अटी शर्ती देऊन मंदिर खुली करण्यास परवानगी दिली मात्र यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णत: फज्जा उडालेला पाहायला मिळाला.