येस न्युज मराठी नेटवर्क : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा रविवारी एक मे रोजी औरंगाबादमध्ये पार पडली. यावेळी आक्रमक भाषण करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दुप्पट आवाजात मशीदींसमोर हनुमान चालिसा वाजविण्याची भूमिका जाहीर केली. या सभेत राज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसला कितीही शिव्याशाप दिले तरी चालतील मात्र राज ठाकरे यांनी सामान्य लोकांना बेजार करणाऱ्या महागाईवर बोलावे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. मुंबईतील देवेंद्र फडणवीस यांचे भाषण संपताच ठाकरे यांचे औरंगाबाद येथील भाषण सुरू होते यामागे माध्यम व्यापण्याची मिलीभगत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
“राज ठाकरे यांच्या औरंगाबाद मधील भाषणात मला काहीच दम वाटला नाही. भाषणात नवीन काहीच मुद्दे नव्हते. मागील सभेत जे मुद्दे मांडले गेले तेच मुद्दे या भाषणात होते. त्यामुळे राज ठाकरे यांच्याकडे नवीन काही सांगण्यासारखे नाही असे दिसतेय. महागाईवर बोलून मग राष्ट्रवादीच्या नेत्यांना शिव्या-शाप द्यायचे असतील तर द्या. पण राज ठाकरेंनी महागाईवर पण बोलावे. पण ते बोलत नसल्याने राज यांच्या भाषणाची स्क्रिप्ट भाजपाने लिहून दिलीय असे दिसते,” असे जयंत पाटील म्हणाले.
“शरद पवारांचा द्वेष करा, त्याच्या विरोधात बोला अशी स्क्रिप्ट राज ठाकरे यांना कुणीतरी दिलीय. ती स्क्रिप्ट वाचण्याचा राज ठाकरेंवर दबाव दिसतोय आणि त्यामुळे ते काही कारणामुळे नाईलाजास्तव शरद पवार यांच्यावर टीका करत आहेत. त्यामुळे भाषणावेळी राज ठाकरे यांची फारच केविलवाणी अवस्था दिसली. शरद पवार यांच्या विरोधात जितके जास्त बोलता येईल आणि महाराष्ट्रमध्ये जातीयवादी विष कालवून, धर्माधर्मात तेढ निर्माण करून समाजात कसे विष पसरवता येईल यासाठी जितके जास्त कसे चिथावणीखोर बोलता येईल तसा प्रयत्न राज ठाकरेंच्या भाषणातून दिसत होता,” असेही जयंत पाटील म्हणाले. देवेंद्र फडणवीस व राज ठाकरेंनी भाषणासाठी अचूक वेळ साधली असून यामागे माध्यम व्यापण्याची मिलीभगत दिसून येते, असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.