मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांवर आयकर विभागाने छापे मारले आहेत. त्यावरून राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी विरोधकांवर टीका केली आहे. दिल्लीने कितीही त्रास दिला तरी महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्लीपुढे झुकणार नाही, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारला ठणकावले.
सुप्रिया सुळे आज ठाण्यात आल्या होत्या. त्यांनी ठाण्यात नवरात्री निमित्त देवीचा आरती केली. ज्यांच्यावर धाडी टाकण्यात आल्या. ते नुसते दादांचे नातेवाईक नाहीत. आमचे देखील नातेवाईक आहेत. आमची जॉइंट फॅमिली आहे. आमचं एक कुटुंब आहे. संघर्ष करणे ही पवारांची खासियत आहे. दिल्लीने कितीही त्रास दिला. महाराष्ट्राचा सह्याद्री हा दिल्ली पुढे झुकणार नाही आणि झुकलाही नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सध्या देशात सूडाचे राजकारण सुरू आहे. आम्ही कधी असे राजकारण केलं नाही. कधीही करणार नाही. आमच्यावर कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आहेत. हीच आमची संस्कृती आहे, असं त्यांनी सांगितलं.