नाशिक : नाशिक येथील खासगी बसच्या अपघातात 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून 38 प्रवासी जखमी झाले आहेत. नाशिक-औरंगाबाद मार्गावर नांदूरनाका या ठिकाणी हा मोठा अपघात झाला आहे. या अपघातानंतर बसने अचानक पेट घेतला. बसला लागलेली आग भीषण असल्याने 11 जणांचा जळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. मात्र, संपूर्ण शरीर जळाले असल्याने त्यांची ओळख पटत नव्हती. मात्र, या अपघाताची अधिक तपासणी केली असता, यामधील मृतांची आणि जखमींची ओळख अखेर पटल्याची माहिती समोर येत आहे.
यवतमाळहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी बसचा नाशिक येथे अपघात झाला. या बसला आग लागली. ही बस स्लीपर कोच होती. या बसमधून एकून 48 प्रवासी प्रवास करत होते. यामधील 11 प्रवाशांचा मृत्यू झाला असून, अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या जखमी प्रवाशांवर सध्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शोक व्यक्त
“नाशिक येथील बस दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्यासोबत माझे विचार आहेत. जखमी लवकरात लवकर बरे होवोत. स्थानिक प्रशासन बाधितांना शक्य ती सर्व मदत करत आहे”, अशा शब्दांत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. पीएमओकडून 2 लाखांची मदत जाहीर करण्यात आली.