सोलापूर – दुष्काळी जिल्हा असा सोलापूर जिल्ह्यावर लागलेला कलंक यंदाच्या वर्षी अतिवृष्टी आणि महापुरामुळे धुऊन निघाला. एवढेच नव्हे तर जिल्ह्यातील सर्व 11 तालुक्यांमध्ये विक्रमी पाऊस झाल्यामुळे सर्वच ठिकाणी दोन ते अडीच मीटरने भूगर्भातील पाणी पातळी वाढली आहे. अनेक ठिकाणी तर बोर आपोआप मोटर चालू न करता वाहत आहेत. ओढे, नाले, पाझर तलाव तुडुंब भरून वाहत आहेत. प्रत्येकाच्या शेत शिवारात अजूनही दलदल आहे त्यामुळे रब्बी पिकाच्या पेरण्या करण्यासाठी आणखी किमान एक महिन्याचा कालावधी लागेल. त्यामुळे यंदाच्या वर्षी संक्रातीपर्यंत सोलापुरी हुरडा मिळणे मुश्कील आहे. उजनी धरण 100 टक्के भरले आहे. हिप्परगा तलाव ओसंडून वाहत आहे. जिल्ह्यातील बहुतांश लघुपाटबंधारे प्रकल्प तसेच तलाव तुडुंब भरले आहेत त्यामुळे यंदाच्या वर्षी उन्हाळ्यात कुठेही टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागणार नाही हे नक्की.

