राज्यातील नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने सत्ताधारी पक्षाचे विविध मंत्री हवेत इमले बांधू लागले आहेत. कुठे काहीही घोषणा करायची तर कुठे मतदारांना भाषणातून दमबाजी करायची अशी प्रकार सुरू झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती मधील भाषणात नुकतेच मला तुम्ही नाकारले तर मी तुम्हाला निधी देणार नाही असे जाहीर वक्तव्य केलं. तसेच अक्कलकोट, बार्शी आणि मोहोळ दौऱ्यावर आल्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगर विकास खाते माझ्याकडे आहे हे सर्वांनी लक्षात ठेवावे. असा इशाराच दिला. अक्कलकोटला जागतिक पर्यटन नकाशावर आणण्याचे भाकीत त्यांनी केले.
मोहिते पाटलांना अनेक वर्ष सत्ता दिली मात्र त्यांनी अकलूजची दुर्दशा केली अशी टीका पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली. भाजपची सत्ता आल्यास निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन दिले. एकूणच नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जुनी उणी – धुणी काढून मतदारांची दिशाभूल करायची आणि वेळ मारून न्यायची असा उद्योग सर्वच राजकारणी मंडळी कडून सुरू आहे.

