सोलापूर जिल्ह्यातून पाऊस गायब झाल्यामुळे पेरण्या रखडल्या. जमिनीतील पाण्याची पातळी खोलवर गेल्यामुळे आणि विहिरीत तसेच बोअरवेल आटू लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सध्या शेतात असलेली पिके पाण्याअभावी माना टाकू लागली आहेत. या पार्श्वभूमीवर उजनी धरणाच्या डाव्या कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडणे गरजेचे आहे. भीमा खोऱ्यात दमदार पाऊस झाल्यामुळे गेल्या सहा दिवसात उजनी धरण मायनस 28% वरून प्लस 45 भरले आहे. शिवाय पुणे जिल्ह्यातील बहुतांश धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत आणि आणखी पावसाचे दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे उजनी धरण 100% भरण्याची आशा आहे. सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी सध्या संकटात सापडला असल्यामुळे उजनीचे पाणी सोडणे गरजेचे बनले आहे . नीरा नदीतून पाणी सोडल्यामुळे आषाढी वारीच्या तोंडावर उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्याचा प्रश्न उद्भवणार नाही.त्यामुळे चार ते पाच टीएमसी पाण्याची बचत होणार आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी याबाबत आवाज उठवून शेतीसाठी उजनीतून पाणी सोडण्याचा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे आग्रह धरणे गरजेचे आहे.










