पंढरपूर, दि. १०: आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी पंढरपूर शहर व पालखी मार्गावर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची बैठक आज आय.एम.ए. हॉल, पंढरपूर येथे पार पडली.बैठकीच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी तथा शिबिर नोडल अधिकारी सदाशिव पडदुणे हे होते.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. मोहन शेगर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय सरडे, मुख्याधिकारी महेश रोकडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नंदकिशोर घाडगे, जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. हर्षल जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, जिल्हा क्षयरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिवंत विनोद, मुख्यमंत्री सहायता निधी अधिकारी डॉ. अविनाश खांडेकर यांच्यासह आरोग्य विभागाचे सर्व संबंधित अधिकारी व आवश्यक इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत वारी कालावधीत पंढरपूर शहर व पालखी मार्गावरील आरोग्य सुविधा, आपत्कालीन वैद्यकीय पथके, औषध साठा, स्वच्छता, शुद्ध पाणीपुरवठा आणि रुग्णवाहिका सेवा यांच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्व विभागांनी समन्वयाने काम करून वारकऱ्यांना आरोग्यदायी आणि सुरक्षित सुविधा पुरविण्याच्या सूचना देण्यात आल्या.
या आरोग्य शिबिराचे महत्त्व पंढरपूर येथे येणाऱ्या वारकरी भाविकांसाठी विशेष आहे. आषाढी वारीत अत्यंत मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने शारीरिक थकवा, उष्माघात, निर्जलीकरण, दीर्घकाळ चालणे आणि इतर आरोग्य तक्रारी उद्भवण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत तातडीने उपचार व आपत्कालीन प्रतिसाद मिळाल्यास गुंतागुंत टाळून जीवितहानीचा धोका कमी होतो.उपस्थित सर्व अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागाच्या तयारीचा आढावा सादर केला. वारीदरम्यान कोणत्याही वारकऱ्याला आरोग्यसेवेपासून वंचित राहावे लागणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले. पंढरपूर शहर व पालखी मार्गावरील आरोग्यसेवा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी समन्वय समन्वय ठेवून दिलेले जबाबदारी काटेकोरपणे पाडण्याचे निर्देश देण्यात आले.










