१३ ते १५ ऑगस्टदरम्यान तिरंगा वस्तू , मिठाई उपलब्ध
सोलापूर : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सद्भावना वंदे मातरम् मंडळाच्या वतीने यंदाही ‘एकता उत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. सद्भावना तिरंगा केंद्र (बंगला)यंदा प्रथमच ३.५ ते ४ फूट उंचीची फायबरची आकर्षक भारतमाता मूर्ती उपलब्ध करून देण्यात आली आहे. १३ ते १५ ऑगस्टदरम्यान तिरंगा वस्तू , मिठाई उपलब्ध राहणार आहेत, अशी माहिती सद्भावना सेवा दलाचे दिव्यकांत गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
३४व्या वर्षात पदार्पण केलेला आणि ६४ व्यांदा आयोजित करण्यात येणाऱ्या या उत्सवाची मोठी तयारी करण्यात आली आहे. या केंद्रावर ६ बाय ९ फुटांचा व ४ बाय ६ फुटांचा राष्ट्रध्वज, तिरंगा फ्लॉक-जॅकेटसह विविध देशप्रेमाच्या वस्तू तिरंगा केंद्रावर उपलब्ध असतील. १३ ते १५ ऑगस्टदरम्यान सद्भावना तिरंगा केंद्रावरून तिरंगा वस्तू आणि मिठाईचे वितरण करण्यात येणार आहे. यंदा प्रथमच बालूशाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय ड्रायफ्रूट तिरंगा मिठाई, केशर लाडू, ड्रायफ्रूट मसाला चिवडा, मसाला शेव-दाळ आदी पदार्थ उपलब्ध असतील.
तिरंगा केंद्रावर राष्ट्रध्वजाबरोबरच देशप्रेमाचे प्रतीक असलेल्या डायमंड तिरंगा अंगठ्या, बॅचेस, कार्यालय किंवा वाहनात लावण्यासाठी आकर्षक क्रॉस-मेटल तिरंगा, क्रॉस अशोकस्तंभ, घड्याळ, भारताचा नकाशा, हातातील कापडी तिरंगा, बँड, मफलर, की-चेन, पताका, तिरंगा स्टिकर, तोरण, कॅप, तिरंगा टी-शर्ट, तिरंगा ओढणी आदी विविध वस्तू उपलब्ध आहेत.
१७ ऑगस्ट रोजी आश्रमशाळा, कॉलनीमध्ये काम करणारे कर्मचारी, वॉचमन, भाजी मार्केटमधील कर्मचारी तसेच सद्भावना कार्यात मदत करणाऱ्यांना देशप्रेमाचे लाडू आणि तिरंगा बर्फीचे वितरण करण्यात येणार आहे. १८ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन उत्सवाच्या आयोजनात हातभार लावणाऱ्या रिक्षाचालकांना लाडू व बर्फीचे वाटप केले जाणार आहे.
या पत्रकार परिषदेस ध्रुवेश गांधी, रोशन शेख, सोना गांधी, श्रुती गांधी, स्नेहा गांधी, रूपा पारेख, नारायण छाब्रिया, मयुर सोलनकर, प्रकाश लोढा, गणेश खेडकर आणि जयदेव बाहेरमठ उपस्थित होते.
१५ ऑगस्टला भारतमाता पूजन
स्वातंत्र्य दिन उत्सवांतर्गत १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता मान्यवरांच्या हस्ते भारतमाता पूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर राष्ट्रीय उत्सवात सहकार्य करणाऱ्या विविध घटकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात येणार आहे.











