मंत्रालयात जेवढे कर्मचारी आहेत तेवढेच म्हणजे सुमारे सात हजार कर्मचारी सोलापूर महापालिकेत कार्यरत आहेत. मात्र इथली प्रशासकीय शिस्त पूर्ण बिघडली आहे. बहुतांश नगरसेवक नव्याने निवडून आल्यामुळे आणि जुने अभ्यासू नगरसेवक नसल्यामुळे अधिकारी नगरसेवकांना एक प्रकारे उल्लू बनवत आहेत. बीओटीचा विषय असो, शाळांच्या दुरुस्तीचा विषय असो, पाणीपुरवठ्याचा विषय असो की भूमी मालमत्ता चा विषय असो. महापालिकेतील अधिकारी पदाधिकाऱ्यांना चुकीची माहिती देऊन वेळ मारून नेतात. काल असाच एक प्रकार स्थायी समितीमध्ये उघड झाला. सिद्धेश्वर तलावालगतची सिटी सर्वे क्रमांक 6043 ही सुमारे 19 हजार चौरस फुटाची जागा असताना ती 2000 आहे असं सांगून भूमी मालमत्ता विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते यांची दिशाभूल केली.
वास्तविक ही जागा हडपण्याचा दुसरीच संस्था प्रयत्न करत आहे. त्यामुळे त्यांना खोडा घालण्यासाठी किंवा दोन्ही संस्थांनी मिळून निम्मी निम्मी जागा घेण्यासाठी हा प्रस्ताव आणण्यात आला. स्थायी समिती सभापती याबाबत अनभिज्ञ होत्या. शिंदे सेनेचे नगरसेवक अमोल शिंदे यांनी या विषयावर आवाज उठल्यावर हा विषय ना मंजूर करण्यात आला. शहरात असे कितीतरी विषय दररोज पत्रकार,नागरिक हे पदाधिकारी आणि प्रशासनाला देतात. मात्र मनमानी कारभार सुरू आहे. यात सर्वसामान्य भरडले जात आहेत. त्यामुळेच लहरी राजा.. प्रजा आंधळी..अधांतरी दरबार..उद्धवा अजब तुझे सरकार… हेच गाणे सोलापूर महापालिकेच्या कारभाराला तंतोतंत लागू पडते.









