सोलापूर : लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने कुरुल-कामती येथील २८ वर्षीय युवक किसन ननवरे याने अनोख्या पद्धतीने शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आंदोलन केले. फेटा-बाशिंग बांधून पूनम गेट येथे त्याने धरणे आंदोलन केले. त्याच्या या अनोख्या आंदोलनाची माहिती मिळताच परिसरात त्याला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना किसन ननवरे याने सरकारने सर्वधर्मीय विवाह नोंदणी केंद्र सुरू करावे, अशी प्रमुख मागणी केली. समाजातील लग्नाळू तरुण-तरुणींना विवाहासाठी योग्य स्थळ मिळावे, यासाठी शासनाने ठोस व्यवस्था निर्माण करण्याची गरज असल्याचे त्याने सांगितले.
बॅनरवर महाराष्ट्रातील लग्नाळू तरुणांचा शांततापूर्ण निषेध आणि लोकशाही मार्गाने मागणी असा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच सर्वधर्मीय विवाह नोंदणी केंद्र, ऑनलाइन तसेच ऑफलाइन विवाह नोंदणी पोर्टल सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. यामुळे दलाली बंद होणे, फसवणूक थांबणे, रोजगार निर्मिती होणे तसेच वेळ व पैसा वाचणे, असे फायदे होतील, असा दावा करण्यात आला आहे.
याशिवाय ५ लाख रुपयांच्या आर्थिक पॅकेजची मागणीही करण्यात आली आहे. त्यामध्ये १ लाख रुपये लग्न अनुदान, २ लाख रुपये घरकुलासाठी तसेच २ लाख रुपये बिनव्याजी कर्ज देण्याची मागणी करण्यात आली आहे. गेल्या दहा वर्षांपासून संघर्ष करूनही घरकुल, कर्ज आणि नोकरी मिळाली नसल्याचा उल्लेखही आंदोलनाच्या बॅनरवर करण्यात आला आहे.
माझ्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा किसन ननवरे याने दिला.









