सहकारमहर्षी कै. वि. गु. शिवदारे जन्मशताब्दी सांगता समारंभात प्रतिपादन; मान्यवरांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान
सोलापूर : माजी आमदार वि. गु. शिवदारे यांनी सोलापूर आणि परिसराच्या विकासात मोलाचे योगदान दिले. शिवदारे आण्णा म्हणजे सोलापूरची मोठी संपत्ती! अशा शब्दात आमदार बसवराज पाटील यांनी शिवदारे अण्णांच्या कार्याचा गौरव केला.
श्री. वि. गु. शिवदारे प्रतिष्ठानच्या वतीने सहकारमहर्षी कै. वि. गु. शिवदारे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा सांगता समारंभ आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळा हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या किर्लोस्कर सभागृहात झाला. या कार्यक्रमात आमदार बसवराज पाटील बोलत होते.
या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार आणि पाण्याचे अभ्यासक रजनीश जोशी यांनी सोलापूरच्या जल-नियोजनावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन व पुरस्कार वितरण महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार बसवराज पाटील (मुरुमकर) यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे यांनी केले.
आमदार बसवराज पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, ‘आण्णांनी सर्वच क्षेत्रांत प्रेरणादायी कार्य केले असून विधिमंडळातही त्यांनी अतिशय मोलाचे योगदान दिले आहे. आण्णा म्हणजे या परिसराची मोठी संपत्ती होते आणि त्यांचा हा कार्याचा वारसा राजशेखर शिवदारे समर्थपणे पुढे नेत आहेत. सोलापूरचा परिसर महाराष्ट्रात राहिला पाहिजे यासाठीही अण्णांनी मोठे प्रयत्न केले. खास करून दक्षिण सोलापूरच्या परिसराला विकासाच्या वाटेवर आणण्याचे काम अण्णांनी केले.’
समाजात दीर्घकाळ उल्लेखनीय व समर्पित कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांना या वेळी ‘जीवन गौरव पुरस्कार व सन्मानचिन्ह’ देऊन गौरविण्यात आले. यामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सोलापूरचे प्रख्यात नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. वीरेंद्र अवस्थी आणि सौ. अनुराधा अवस्थी यांचा सन्मान करण्यात आला. पत्रकारिता क्षेत्रातील पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार राहुल कुलकर्णी यांना जाहीर झाला असून त्यांच्या वतीने बंधू अमर कुलकर्णी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. कृषी क्षेत्रातील कार्याबद्दल बार्शीचे प्रगतिशील शेतकरी दिनकर गुंड आणि सौ. गुंड यांना सन्मानित करण्यात आले, तर सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान संचलित यमगरवाडी येथील एकलव्य आश्रम शाळेचा गौरव करण्यात आला. ॲड. प्रदीपसिंह राजपूत, संतोष शिर्के आणि अशोक संकलेचा यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
यासोबतच शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त प्रणव बिराजदार, गंगाधर बिराजदार आणि शिवानंद शिंगडगाव यांचाही गौरव करण्यात आला, तसेच जलतरण स्पर्धेत उत्तम यश मिळवल्याबद्दल श्रद्धा किनगी – यलगाम यांना प्रोत्साहनपर सन्मानित करण्यात आले.
या सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार, पाण्याचे अभ्यासक रजनीश जोशी यांनी ‘सोलापूर जिल्ह्याचे जल-नियोजन’ या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी केली. पाण्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी आपण जिंती ते हल्ली हिळ्ळी असा नदीकाठाने प्रवास केल्याचे सांगत ते म्हणाले की, सिद्धेश्वर महाराजांनी लोकसहभागातून तलाव खोदून पाणी उपलब्ध करून दिले होते आणि आजच्या काळातही लोकसहभागातून जलव्यवस्थापन करणे नितांत गरजेचे आहे. सोलापूर जिल्हा हा पर्जन्यछायेच्या प्रदेशात येत असून येथे केवळ ४५ दिवसांचा पावसाळा असतो आणि जिल्ह्यात सरासरी ५५० मिलिमीटर इतकाच पाऊस पडतो. आपल्याकडे प्रामुख्याने परतीचा पाऊस येत असल्याने वार्षिक पाऊस हीच आपली ‘जल कमाई’ मानून पडणारा प्रत्येक थेंब साठवला पाहिजे. गावातील पाऊस गावातच अडवून शेतजमिनीत साठवला पाहिजे आणि भूजल पातळी वाढवण्यासाठी जलपुनर्भरण करणे आवश्यक आहे. उजनी धरणात ११७ टीएमसी पाणी साठवले जात असले, तरी नद्या आणि कालवे एकमेकांना जोडून वाहून जाणारे पाणी अडवले पाहिजे. वेळीच पाण्याचे योग्य नियोजन केले नाही, तर सोलापूरसमोर गंभीर संकट उभे राहील आणि जिल्हा ‘डार्क झोन’मध्ये जाईल, असा इशारा त्यांनी दिला. तसेच शिवदारे आण्णांनीही लोकसहभागातून अशी अनेक कामे उभी केली होती, अशा आठवणी त्यांनी या वेळी जागवल्या.
या प्रसंगी सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँकेचे चेअरमन नरेंद्र गंभीरे, माजी अध्यक्ष प्रकाश वाले, भारती शिवदारे, सुचेता थोबडे, रूपाली बिराजदार, सुरेखा गंभीरे यांच्यासह बँकेचे सर्व संचालक मंडळ, प्रतिष्ठानचे विश्वस्त, प्रतिष्ठित नागरिक व विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन शुभदा उपासे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार डॉ. बाहुबली दोशी यांनी मानले.











