आषाढी एकादशीच्या निमित्ताने गोविंदश्री सभागृहात आयोजित करण्यात आलेला गायक दीपक कलढोणे यांचा ‘शांतिब्रह्म’ हा भक्तिसंगीत कार्यक्रम भाविकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला.
शनिवारी गोविंदश्री मंगल कार्यालयात दुर्वांकुर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने संतसाहित्यातून सामाजिक एकोपा वृद्धिंगत व्हावा या उद्देशाने दरवर्षी भक्तिसंगीत उत्सवाचे आयोजन केले जाते. यंदा संत एकनाथ महाराज यांच्या जीवनचरित्रावर आणि अभंगगायनावर आधारित ‘शांतिब्रह्म’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गायनसेवाव्रताच्या 20 व्या वर्षानिमित्त सादर करण्यात आलेले हे २० वे भक्तिपुष्प विठ्ठल-रुक्मिणी चरणी समर्पित करण्यात आले.
कार्यक्रमात ‘या पंढरीचे सुख पाहता लोचनी’, ‘कानडा विठ्ठल’, ‘काया ही पंढरी’, ‘माझे माहेर पंढरी’, ‘रामनाम ज्याचे मुखी’, ‘यांसह संत भानुदास महाराज यांची ‘वृंदावनी वेणु वाजे’ ही गौळण सादर करण्यात आली. तसेच दीपक कलढोणे यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘धन्य आजि दिन संतदर्शनाचा’ या अभंगाने कार्यक्रमातील भक्तिरस अधिकच उंचावला. विठ्ठल नामाच्या गजरात रंगलेल्या या कार्यक्रमाला श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात भरभरून दाद दिली.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांनी संत एकनाथ महाराजांच्या जीवनकार्यावर सूत्रसंचालनाच्या माध्यमातून प्रकाश टाकला. कलढोणे यांना संवादिनी व स्वरसाथ नीरज कलढोणे यांनी दिली. कोल्हापूरचे प्रसिद्ध तबलावादक तालमार्तंड डॉ. पं. सचिन कचोटे आणि प्रसाद कुलकर्णी यांनी तबल्याची रंगतदार साथसंगत केली. वर्धराज मिर्जी, नागराज शेट्टी व महेश जाधव यांनी अनुगायन केले. निरंजनी कलढोणे व परिणिता कुलकर्णी यांनी तानपुरा साथ दिली, तर दिलीप पोतदार व अनंत जोशी यांनी तालवाद्यांची साथसंगत केली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाराष्ट्र बँकेचे झोनल मॅनेजर मिथिलेशकुमार पांड्ये, लोकमतचे उपसंपादक रवींद्र देशमुख , तरुण भारतचे संपादक प्रशांत माने, येस न्यूज मराठी चे संपादक शिवाजी सुरवसे, यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती व संत एकनाथ महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ जुळे सोलापूरच्या अध्यक्षा डॉ. नयना व्यवहारे, उद्योजक महावीर गुंडाळे, ऑटोमोबाईल संशोधक राहुल बुऱ्हाणपुरे, ज्येष्ठ तबलावादक महेश पाटील, गायिका पूनम फालके, संजय नागरस यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. जगदीश पाटील, वैभव सुरवसे, सीमा सिंहासन, मल्लिकार्जुन कोरे, बसवराज जमखंडी आदींनी विशेष परिश्रम घेतले.










