केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देशाच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे. या घडामोडींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी मोठा दावा केला आहे. आंदोलक विद्यार्थी आणि केंद्र सरकार यांच्यात संवाद घडवून आणण्यासाठी आपण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती आणि त्याच चर्चेचा परिणाम म्हणून धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले की, आंदोलक विद्यार्थ्यांच्या मागण्यांनुसार केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला असून हा देशातील युवाशक्तीच्या एकजुटीचा मोठा विजय आहे. अन्यायाविरोधात शांततेने लढा देणाऱ्या युवकांचे त्यांनी कौतुक केले.
पुढे बोलताना पवार यांनी सांगितले की, त्यांनी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन सरकारने आंदोलकांशी संवाद साधावा, अशी विनंती केली होती. लोकशाहीत संवाद आवश्यक असल्याचे सांगत सरकारने विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे, असा आग्रह त्यांनी धरला होता.
शरद पवार यांच्या म्हणण्यानुसार, सरकार आणि आंदोलक यांच्यात सुसंवादाची तयारी झाली आणि त्यानंतरच आज धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा निर्णय झाला.
दिल्लीतील आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठीमार आणि अश्रुधूराच्या वापरावरही शरद पवार यांनी टीका केली. नव्या पिढीशी संवाद साधताना अशा कठोर उपाययोजना टाळल्या असत्या तर अधिक योग्य झाले असते, असे त्यांनी म्हटले.










