सोलापूर- केंद्र सरकारच्या वतीने 26 जानेवारी 2027 रोजी प्रजासत्ताक दिनी घोषित होणाऱ्या पद्म पुरस्कारासाठी ऑनलाईन पध्दतीने नामांकने, शिफारशी मागविण्यात येत आहे. सोलापूर जिल्हयातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पात्र व इच्छूक मान्यवरांनी तसेच विविध विभागांनी आपली नामांकने 31 जुलै 2026 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने सादर करावीत असे आवाहन सोलापूर जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
पद्म पुरस्कार हे देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असून ते कला, साहित्य,शिक्षण, क्रिडा, औषधोपचार, समाजसेवा, विज्ञान, अभियांत्रिकी, लोकव्यवहार,नागरीसेवा, व्यापार आणि उद्योग यासारख्या विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय आणि अपवादात्मक कामगिरीसाठी दिले जातात.
पुरस्कारासाठीच्या निकष व अटी-
उत्कृष्टतेपेक्षा अधिक : शिफारस करताना संबंधित क्षेत्रातील अत्यंत उत्कृष्ट कार्य व त्यात समाजसेवेचा अंश असणे आवश्यक आहे.
पारदर्शता व शोध : जे कलावंत किंवा कार्यकर्ते प्रसिध्दीच्या वलयात नाहीत, मात्र त्यांचे कार्य अत्यंत प्रशसनीय आहे, अशा व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचे नामांकन करण्याबाबत प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत.
समाजातील सर्व घटकांना प्रितिनिधित्व : महिला, अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), इतर मागावर्गीय (OBC), दिव्यांग व्यक्ती आणि समाजातील कुमकुवत घटकांमधील गुणवंत व्यक्तींचा प्राधान्याने विचार व्हावा.
मरणोत्तर पुरस्कार : मरणोत्तर पुरस्कारासाठी शिफारस केली जाऊ नये. मात्र अपवादात्मक प्रकरणात जानेवारी 2026 नंतर निधन झालेल्या व्यक्तींचा विचार केला जाऊ शकतो.
शासकीय कर्मचारी अपात्र : शासकीय सेवेतील तसेच सार्वनिक उपक्रमातील अधिकारी, कर्मचारी या पुरस्कारासाठी पात्र नाहीत. डॉक्टर आणि वैज्ञानिक यांना यातून सूट देण्यात आली आहे.
कालावधी : पद्मभूषण पुरस्कारासाठी पद्मश्री मिळाल्यानंतर 5 वर्षांनी तर पद्मविभूषणासाठी पद्मभूषण मिळाल्यांनतर 5 वर्षांनी शिफारस करता येईल.
या सर्व पुरस्कारांसाठी सर्व नामांकने केवळ https:// awards.gov.in या राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने स्विकारली जाणार आहेत. नामांकन सादर करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2026 ही असून, त्यानंतर प्राप्त होणाऱ्या शिफारशींचा विचार केला जाणार नाही. अधिक माहितीसाठी केंद्र सरकारच्या https://padmaawards.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.











