सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी चंग बांधला होता. एवढेच नव्हे तर जिल्ह्यातील भल्याभल्या नेत्यांनी त्यांचे नेतृत्व मान्य करत माघार देखील घेतली. काँग्रेसचे आदित्य फतेपुरकर यांचा अर्ज छाननीत बाद झाल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होईल असे वाटले होते. मात्र उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या सात जणांपैकी पाच जणांनी आज शेवटच्या दिवशी आपली उमेदवारी अर्ज माघार घेतली. यामध्ये मोहोळचे रमेश बारस्कर , पंढरपूरचे महेश साठे, वेळापूरचे जीवन जानकर, बार्शीचे नागेश अक्कलकोटे, कुर्डूवाडी चे धनंजय डिकोळे या अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज माघार घेतले. पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील वसंत नाना देशमुख यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून भरलेला अर्ज माघार घेण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले मात्र भाजपला आणि विशेषतः पालक मंत्र्यांना यामध्ये यश मिळाले नाही. त्यामुळे अखेर सोलापूर मतदार संघातून भाजपचे राजेंद्र राऊत विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे वसंत देशमुख यांच्यात सामना रंगणार आहे. 616 मतदार असलेल्या या मतदारसंघात महायुतेचे संख्याबळ जवळपास 400 च्या आसपास आहे मात्र गुप्त मतदान असल्यामुळे धनलक्ष्मी पावल्यास गडबड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपने आता ही लढाई अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. 18 जून रोजी सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत यासाठी मतदान होणार असून याचा फैसला 22 जून रोजी होणार आहे. त्यामुळे आता झेडपी महापालिका आणि नगरपालिका यामधील सदस्य असलेले हे मतदार राजाभाऊ ला मतदान करणार की वसंत नानांना याची उत्सुकता ताणली गेली आहे.










