सोलापूर शहरातील 123 वर्ष जुना झालेला रेल्वेचा पूल पाडण्याची चर्चा वर्षभरापासून सुरू असताना महापालिकेने याची गंभीर दखल घेतली नाही. आता 14 डिसेंबर रोजी तब्बल बारा तासांचा ब्लॉक घेऊन दमाणी नगरचा हा रेल्वे ब्रिज पाडणार असल्याचे रेल्वे, भारतीय महामार्ग प्राधिकरण आणि महापालिका यांच्या बैठकीत निश्चित झाले. एक डिसेंबर पासून पर्यायी मार्गावरून वाहतूक वळविण्यात येणार आहे. त्यामुळे आता महापालिकेचे अधिकारी खडबडून जागे झाले आहेत. 54 मीटरचा रस्ता पूर्ण केल्याशिवाय रेल्वे ब्रिज पाडू नका अशी सारवासारव महापालिका अधिकारी करू लागले आहेत. छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून अवंती नगर मार्गे पुढे सीएनएस हॉस्पिटल पर्यंत जाणारा 54 मीटर रस्ता.
हा रेल्वे ट्रॅकच्या पलीकडे जाण्यासाठी एकमेव चांगला पर्यायी मार्ग झाला असता, मात्र हा रस्ता करण्यास महापालिकेला यश आले नाही. 18 कोटी रुपये खर्चून अवंती नगर येथे रेल्वे अंडर ब्रिज बांधण्यात आला. दोन्ही बाजूचे ॲपरोच रस्ता निधी असताना देखील महापालिकेने केला नाही. हे काम रडत खडत सुरू आहे. तसेच ज्या भागाच्या झोपड्या आठ महिन्यापूर्वी काढल्या तिथे 200 मीटरचा रस्ता करण्याचे काम आता सुरू झाले आहे . या दोन्ही बाबीकडे महापालिकेने लक्ष दिले असते तर 54 मीटर रस्त्यावरती वाहतूक सुरू झाली असती . आता रेल्वेचा ब्रिज पाडल्यानंतर 54 मीटर रस्ता झाला नसल्यामुळे खूप मोठी समस्या निर्माण होणार आहे .










