सोलापूर : शेततळ्यात बुडून मरण पावलेल्या मार्डी येथील तीन मुलींच्या कुटुंबाला जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी सायंकाळी भेट देऊनदोन्ही कुटुंबांचे सांत्वन केले. घडलेली घटना ही अतिशय दुर्दैवी असून नियतीपुढे कोणाचेच चालत नाही तेव्हा स्वतःला सावरून दुःखातून बाहेर या, असे सांत्वन करुन मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
पालकमंत्री भरणे हे शुक्रवारी सोलापूरच्या दौ-यावर आले असता त्यांना मार्डी येथील तीन मुलींच्या दुर्दैवी मृत्युची घटना पत्रकारांनी सांगितली. त्यावेळी त्यांनी पुजा विजय गरड, सानिका विजय गरड या मयत मुलींच्या मार्डी येथील घरी येऊन व मार्डीजवळच असलेल्या सेवालालनगर येथील मरण पावलेल्या आकांक्षा युवराज वडजे या मुलीच्या घरी जाऊन भेट देऊन या तिन्ही मुलींच्या आई-वडिलांचे सांत्वन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रल्हाद काशीद, मार्डी सोसायटीचे चेअरमन बाबासाहेब पाटील, मार्डी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष मनोहर जगताप, सेवालालनगरचे सरपंच संजय वडजे, भाजपाचे ज्येष्ठ नेते शिवाजी सोनार, विष्णु जगताप, शशिकांत मार्तंडे, जयदत्त मार्तंडे यावेळी उपस्थित होते. तीनही मुलींच्या कुटुंबियांच्या दुःखात पालकमंत्री या नात्याने मी सहभागी असल्याचे सांगून शासनस्तरावरुन मदत मिळवून देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करु, असा पुनरुच्चार त्यांनी केला.