एल निनो च्या पार्श्वभूमीवर यंदा जून अखेरीस खडकवासला धरण साखळीत अवघा 12 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता .त्यामुळे पुणे शहर आणि जिल्ह्यात पाणी कपातीचे आणि दुष्काळाचे सावट निर्माण झाले .मात्र ,जुलै महिन्यातील दमदार पावसाने हे चित्र पालटले. जुलैपासून पावसाचा जोर वाढल्याने चारही धरणे शंभर टक्के भरली आहेत.त्यामुळे पुणेकरांची वर्षभरासाठीची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.
खडकवासला धरण साखळीतील टेमघर धरण हे आता पूर्ण क्षमतेने भरले आहे. 23 जुलैपासून सलग तेरा दिवस मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे .यंदाच्या हंगामात आत्तापर्यंत 11.62 टीएमसी पाणी नदीत सोडण्यात आले असून हे पाणी पुढे उजनी धरणात जात आहे तसेच शेतीसाठी कालव्यातून ही पाणी सोडले जात आहे.











