सोलापूर : वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपली नवकल्पना आणि तांत्रिक गुणवत्ता सिद्ध केली आहे. चंदीगड युनिव्हर्सिटी, उत्तर प्रदेश कॅम्पस यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय स्तरावरील “हॅक विथ उत्तर प्रदेश २०२५” या स्पर्धेत डब्ल्यू.आय.टी.च्या विद्यार्थ्यांनी पहिला क्रमांक पटकावला. विजेत्या संघाला ₹५०,००० रोख पारितोषिक मिळाले असून, त्यांनी महाविद्यालयाचा झेंडा राष्ट्रीय स्तरावर फडकवला आहे.
“टीमला विविध डोमेन्समध्ये ऐनवेळी प्रॉब्लेम स्टेटमेंट मिळाले, आमच्या टीमने “सायबर सिक्युरिटी” ही थीम निवडली. टीम आधीपासूनच एका प्रोटोटाइपवर काम करत होती, त्यामुळे ही एक नैसर्गिक निवड होती. इतर टीम्स IIT कानपूर, IIT वाराणसी अशा विविध IITs मधून आल्या होत्या, त्यामुळे स्पर्धा खूपच चुरशीची होती, आणि डब्ल्यू.आय.टी. टीमने सायबर सिक्युरिटी डोमेनमध्ये पहिले बक्षीस पटकावून खूप चांगली कामगिरी केली आहे.”
या हॅकथॉनमध्ये देशभरातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील संघांनी सहभाग घेतला होता. “एजेण्टिक सास अप्लिकेशन डेव्हलपमेंट हॅकाथॉन” या विषयावर आधारित या स्पर्धेचा उद्देश नव्या तंत्रज्ञानावर आधारीत उद्योगाभिमुख उपाय शोधणे आणि तरुणांमध्ये स्टार्टअप व नवकल्पनांची संस्कृती प्रोत्साहित करणे हा होता. विजेत्या संघात तनमय पाटील, मायुरी गायकवाड, रोहन बेलसरे, अभिजीत मौर्य सर्व तृतीय वर्ष ईसीएम विभाग आणि मोनिका कोटे , तृतीय वर्ष आयटी यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी तयार केलेले एजेण्टिक सास अप्लिकेशन हे कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित, कार्यक्षम आणि वापरकर्त्याभिमुख असे आत्मनिर्णयक्षम उत्पादन ठरले.
ही स्पर्धा भारत सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, नॅशनल सायन्स अँड टेक्नॉलॉजी आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट बोर्ड , मेइटी स्टार्टअप हब आणि डीपीआयआयटी यांच्या स्टार्टअप इंडिया उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे या यशाला राष्ट्रीय स्तरावर विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कामगिरीमुळे डब्ल्यू.आय.टी.मध्ये नवोन्मेष, संशोधन आणि उद्योजकतेला नवसंजीवनी मिळाली असून, हे यश सोलापूर तसेच महाराष्ट्रातील सर्व अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. “मेक इन इंडिया इनोव्हेटिव्ह फॉर इंडिया ” या भावनेने पुढे जाण्यासाठी ही कामगिरी पुढील पिढीला नक्कीच प्रेरणा देईल.
या यशामागे विद्यार्थ्यांचे अथक परिश्रम, तांत्रिक दृष्टिकोन आणि मार्गदर्शक प्राध्यापकांचे दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शन यांचा मोलाचा वाटा आहे. वालचंद शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉ. रणजित गांधी, प्राचार्य डॉ. विजय आठवले, ईसीएम विभाग प्रमुख डॉ. सचिन गेंगजे, मार्गदर्शक प्रा. अभिजीत मोंफरे तसेच सर्व प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

