मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारला रविवारी दोन वर्षे पूर्ण झाली. अशावेळी आज विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही सरकार पाडणार नाही, हे सरकार अंतर्विरोधानेच पडेल, असा दावा केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांना सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. हे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल असं तुम्हाला वाटतं का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, ‘भारताचा राजकीय इतिहास पाहिला तर अशी सरकारं फार काळ चालत नाहीत. ती अंतर्विरोधाने पडतात. जेव्हा सरकार अंतर्विरोधाने पडतात त्यावेळी आज पडेल की उद्या पडेल हे सांगता येत नाही. जेव्हा सरकार सर्वात मजबूत आहे असं वाटतं तेव्हाच ते पडतं. जेव्हा आता पडेल असं वाटतं तेव्हा ते टिकतं. त्यामुळे ही अशी सरकारे टिकत नाहीत. ते आपल्या अंतर्विरोधानेच पडेल. पहिल्या दिवशीपासून सांगतोय आम्ही सरकार पाडणार नाही. ज्या दिवशी सरकार पडेल. तेव्हा आम्ही पर्यायी सरकार देऊ’.