नवी दिल्ली : केंद्राकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलनाचा आजचा तब्बल ६९ वा दिवस आहे. दोन महिन्यांहून अधिक काळापासून हे शेतकरी आंदोलक राजधानी दिल्लीच्या वेगवेगळ्या सीमांवर आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी आपली सगळी शक्ती पणाला लावलीय. याच पार्श्वभूमीवर, विरोधकांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
रस्त्यापासून ते संसदेपर्यंत प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसकडून मोदी सरकारला घेरण्याची तयारी करण्यात आलीय.सोमवारी, टिकरी सीमेवर सिमेंट ब्लॉकसहीत एक मोठी भिंत उभारण्यात आली, तसंच बॅरिकेडिंगचे सात थर लावण्यात आले आहेत. . इतकंच नाही तर दिल्लीत प्रवेश करणाऱ्या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी रस्ता खोदून अणकुचिदार, लांब खिळे आणि टोकदार सळया बसवण्यात आल्या आहेत. सीमेवर रोड रोलरदेखील दिसत आहेत. दिल्लीत प्रवेश करणाऱ्या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी हे रोड रोलर रस्त्यात उभे केले जाऊ शकतात.या तणावपूर्ण परिस्थितीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावरच काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी निशाणा साधला. ‘एकसंध करा, भिंती उभारू नका’असं ट्विट राहुल गांधी यांनी मोदी सरकारला उद्देशून केलं आहे.