येस न्युज मराठी नेटवर्क : काँग्रेसची नुकतीच पार पडलेली कार्यकारिणीची बैठक आणि तीत अध्यक्षपदी निवड करण्यासाठी आणखी सहा महिन्यांचा मागून घेतलेला वेळ. काँग्रेसला आपले इतिहासाचे ओझे झुगारून निर्णय घेता येत नाही आणि दिवसेंदिवस त्यांची स्थिती अधिक केविलवाणी होत आहे.
केवळ एका कुटुंबावर अवलंबून राहिल्याने आणि आता त्या कुटुंबातील नवीन वारसाला त्याच्या पद्धतीने पक्ष चालविण्याचे स्वातंत्र्य न दिल्याने काँग्रेसची ही अवस्था झाली आहे. गेली वर्ष-दीड वर्ष हा पक्ष निर्नायकी अवस्थेत वाटचाल करताना दिसतो आहे. राहुल गांधी हेच पक्षाचे पुन्हा अध्यक्ष होणार असतील तर आजूबाजूचे नेते बदलण्याची गरज आहे. या प्रक्रियेत काही कठीण निर्णय घ्यावे लागतील, काही ज्येष्ठांना मार्गदर्शकाच्या भूमिकेत घालवावे लागेल. काही तरूण नेत्यांनी त्यांना जबाबदारी दिल्यावर केलेल्या चुकाही पदरात घ्याव्या लागतील, पण त्यांना स्वातंत्र्य देण्याची गरज असेल. त्यांना त्यांच्या पद्धतीने काम करण्यासाठी बळ देणे गरजेचे ठरेल. करोनानंतरच्या परिस्थितीत आपल्यापैकी अनेकांच्या आयुष्यात अनेक मोठे बदल झाले. त्यावर आपण प्रत्येकाने काही तरी मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला. सभोवताली नजर टाकली तर बरेच काही बदल झालेले दिसतात. मग काँग्रेससारख्या पक्षाला ते का उमगत नाही हा प्रश्न पडतो.
लोकशाही प्रक्रियेमध्ये सत्ताधारी पक्षाबरोबरच विरोधी पक्षाचेही महत्त्व असतेच. विरोधाचा आवाज ऐकूच आला नाही, तर लोकशाही हुकूमशाहीकडे जाण्याचा धोका असतो, असे बरेच काही आपण ऐकून आहोत. या सगळ्या प्रक्रियेकडे आपल्याला आपल्या देशाला जाऊन द्यायचे नसेल तर विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसनेच नव्हे तर सत्तेत असलेल्या भाजपलाही मार्ग शोधावेच लागतील.