मुंबई : “टीम इंडिया विरुद्धच्या कसोटी मालिकेतील एकही सामना इंग्लंडला जिंकता येणार नाही. इंग्लंडचे फिरकीपटूंमुळे त्यांना एकही कसोटी जिंकता येणार नाही. त्यांचे फिरकीपटू हे इंग्लंडचे वीक पॉईंट आहेत. टीम इंडिया ही 4 सामन्यांची मालिका 3-0 किंवा 3-1 च्या फरकाने जिंकेल. या मालिकेतील तिसरी कसोटी डे नाईट खेळण्यात येणार आहे. इंग्लंडला हा सामना जिंकण्याची 50 टक्केच संधी आहे”, अशी भविष्यवाणी टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने केली आहे. गंभीर स्टार स्पोर्ट्सच्या गेम प्लान कार्यक्रमात सहभागी झाला होता. यावेळेस त्याने या मालिकेबाबतचा अंदाज वर्तवला.
गंभीर काय म्हणाला?
“इंग्लंडचे फिरकीपटू हे त्यांची उणीवेची बाजू आहे. हे फिरकीपटू इंग्लंडला आपल्या फिरकीच्या जोरावर एकाही सामन्यात विजय मिळवून देतील असं वाटत नाही” असं म्हणत गंभीरने इंग्लंडच्या स्पीन अॅटेकवर टीका केली. इंग्लंडकडे मोईन अली (Moin Ali), डोम बेस आणि जॅक लीचसारखे फिरकीपटू आहेत. अनुभवी मोईनने 60 सामन्यात 181 विकेट्स घेतल्या आहेत. तर बेस आणि लीचने खेळलेल्या प्रत्येकी 12 सामन्यात 31 आणि 44 विकेट्स घेतल्या आहेत.