येस न्युज नेटवर्क : सध्या सोशल मीडियावर भारत विरुद्ध पाकिस्तान, इंडिया वर्सेस पाकिस्तान अशाच संदर्भाच्या पोस्ट पाहायला मिळतील. कुठे बुमराहच्या नसण्याची चिंता, तर कुठे विराटच्या फॉर्मची धाकधुक, एकंदरीत काय तर सर्वत्र भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची उत्सुकता वाढली आहे. आशिया कपचा ग्रुप स्टेजचा सामना असतानाही इतकी क्रेझ तर विचार करा आशिया कप फायनलमध्ये दोघे आमने-सामने आले तर? हे होऊ शकतं, नेमकं कसं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
तर आता आशिया कपच्या सामन्यांना 27 ऑगस्ट पासून सुरुवात होत आहे. ग्रुप स्टेजचे सामने 27 ऑगस्ट ते 2 सप्टेंबरपर्यंत खेळवले जातील. यामध्ये भारत आपला एक सामना 28 ऑगस्टला पाकिस्तानविरुद्ध तर दुसरा 31 ऑगस्टला हाँगकाँगविरुद्ध खेळेल. दुसरीकडे ग्रुप बी मध्ये श्रीलंका, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान हे संघ एकमेंकाविरुद्ध भिडतील. आता ग्रुप स्टेजमध्ये टॉप 2 वर असणारे प्रत्येकी दोन-दोन संघ सुपर 4 मध्ये जातील. त्यामुळे हाँगकाँगचा खेळ पाहता ग्रुप ए मधून भारत आणि पाकिस्तानच पुढील फेऱीत जाण्याची दाट शक्यता आहे.
सुपर 4 मध्ये होऊ शकतो सामना
ग्रुप स्टेजनंतर सुपर 4 मध्ये आलेले चारही संघ राऊंड रॉबिन फॉर्मेटमध्ये इतर तीन संघासोबत एक-एक सामना खेळतील. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला भारत पाकिस्तान सामना पाहायला मिळू शकतो. सुपर 4 चे सामने संपल्यानंतर गुणतालिकेतील टॉप 2 संघ आशिया चषकाच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरणार आहेत. आता या संपूर्ण स्पर्धेचा विचार केला तर ग्रुप बी मधील देखील श्रीलंका, बांग्लादेश, अफगाणिस्तान या साऱ्यांच्या तुलनेत भारत आणि पाकिस्तानचा फॉर्म चांगला असल्याने दोघेच सुपर 4 मध्येही आघाडीवर राहू शकतात आणि असं झाल्यास भारत विरुद्ध पाकिस्तान हा महामुकाबला आशिया कपच्या महाअंतिम सामन्यातही आपल्याला पाहायला मिळू शकतो.