मुंबई : महाराष्ट्र हा सध्या देशातील कोरोनाच्या प्रादुर्भावाचे मुख्य केंद्र बनला आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार महाराष्ट्राला ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शन्सचा साठा पुरवत आहे. मात्र, या मदतीचे योग्यप्रकारे वाटप होत नाही. ऑक्सिजन आणि रेमडेसिविरचा जास्तीत जास्त साठा पॉवरफूल मंत्र्यांच्या जिल्ह्यांमध्येच जात आहे. त्यामुळे उर्वरित जिल्ह्यांतील लोकांवर अन्याय होत असल्याचे वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.
ते शनिवारी पालघर जिल्ह्यातील कोविड सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. पालघरसारख्या जिल्ह्याकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष होत आहे. एखाद्या जिल्ह्यात किती रुग्ण, बेडस् आणि आरोग्य सुविधा आहेत, याचा विचार केला जात नाही. ताकदवान नेते केंद्राकडून आलेली मदत आपापल्या जिल्ह्यांमध्ये नेत आहेत. मंत्री हे सर्व राज्याचे असतात. त्यामुळे त्यांनी सगळं आमच्याच जिल्ह्यात आलं पाहिजे, अशी मानसिकता ठेऊ नये, असे खडेबोल फडणवीसांनी महाविकासआघाडीला सुनावले.