सोलापूर : महिलांना लघुउद्योगासाठी आर्थिक बळ देणाऱ्या श्री समर्थ महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते आज उत्साहात संपन्न झाले.
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी या पतसंस्थेने मोलाचे काम केले आहे. लोकांचा संस्थेवर विश्वास असेल तरच प्रगती होते. भविष्यातही ही संस्था असेच चांगले काम करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी पतसंस्थेचे आधारस्तंभ दिनकर देशमुख यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशनही करण्यात आले. “मी नक्कीच वेळ काढून हे आत्मचरित्र वाचेल. देशमुख यांच्या कार्यातून अनेकांना प्रेरणा मिळेल,” असे गौरवोद्गार पालकमंत्री गोरे यांनी काढले. सोलापूर जिल्ह्यात काम करताना माऊलींच्या पालखी सोहळ्याची सेवा करण्याची संधी मिळाली, याचा आनंद आणि समाधान असल्याचेही ते म्हणाले. या संस्थेच्या माध्यमातून गोरगरिबांच्या कुटुंबांचे संसार उभे राहावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले म्हणाले की, अध्यक्षा नीता देशमुख आणि सर्व महिला संचालकांच्या मेहनतीमुळे केवळ 4 वर्षांत या पतसंस्थेचा 40 कोटींचा व्यवसाय झाला आहे. पतसंस्था चालवणे ही तारेवरची कसरत आहे. विश्वस्त भावनेतून काम केले तरच संस्था यशस्वी होते. स्वतःच्या मालकीच्या इमारतीत स्थलांतर झाल्याने ठेवीदारांचा विश्वास नक्कीच वाढेल. पुढील पाच वर्षांचे नियोजन करून या संस्थेने वटवृक्षासारखी राज्यभर भरारी घ्यावी, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, माजी आमदार राजन पाटील, नगरसेविका रोहिणी तडवळकर, श्री. शशिकांत चव्हाण, पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ. नीता देशमुख, उपाध्यक्षा संगीता जाधव, अखिल भाविक वारकरी मंडळाचे अध्यक्ष सुधाकर इंगळे महाराज, प्रकाश वानकर, अंकुश अवताडे, प्रा. माऊली जाधव, संग्रामसिंह भालके यांच्यासह पतसंस्थेच्या सर्व संचालिका आणि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिनकर देशमुख यांनी केले. संचालक महिला मंडळाच्या सहकार्यामुळेच ही संस्था उभी राहिली, असे ते म्हणाले. सूत्रसंचालन सचिन मिसाळ यांनी तर आभार प्रवीण ननवरे यांनी मानले.















