भविष्यात सोलापूरच्या रेल्वे स्थानकाचे तसेच सोलापूर शहराचे महत्व अधिकच वाढणार आहे. दक्षिण आणि उत्तर भारताला जोडणारे महत्त्वाचे स्टेशन म्हणून सोलापूर रेल्वे स्थानकाकडे पाहिले जाते. दररोज सुमारे 130 ते 135 रेल्वे गाड्या या स्थानकातून ये -जा करतात. रेल्वे प्रवासी गाड्यांची वाढणारी संख्या आणि रेल्वे मालवाहतुकीची संख्या विचारात घेऊन आता सोलापूर शहराच्या बाहेरील बाजूनी आणखी दोन नवीन रेल्वे ट्रॅक केले जाणार आहेत. याची भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली असून कोण कोणत्या गावातून हे नवीन रेल्वे ट्रॅक जाणार याबाबत वृत्तपत्रातून आजच प्रसिद्धीकरण करण्यात आले आहे. पुणे -सोलापूर -वाडी हा रेल्वेचा ऊर्जा कॉरिडॉर म्हणून जाहीर करण्यात आला असून या दरम्यान 395 किलोमीटर लांब अशी रेल्वेची तिसरी आणि चौथी लाईन टाकली जाणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट अशा सहा तालुक्यातील 603 गावातून हा रेल्वेचा नवीन मार्ग जाणार आहे. यासाठी सुमारे 15 ते 20 हजार कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. ही तिसरी आणि चौथी लाईन झाल्यानंतर सोलापूर शहरातील माल रेल्वे वाहतूक बाहेरून वळवली जाणार असून प्रवासी वाहतुकीच्या ताण कमी होईल तसेच गती देखील वाढेल. रेल्वेचा हा नवीन ट्रॅक सोलापूर शहराच्या भोवती म्हणजे बेलाटी -हत्तुर -डोणगाव – होटगी- तिलाठी -आहेरवाडी अशा बाहेरच्या बाजूने टाकण्यात येणार आहे. यामुळे भविष्यात पुणे -सोलापूर -वाडी या महत्वकांक्षी ऊर्जा रेल्वे कॉरिडॉर ला अधिक महत्त्व येणार आहे.






