वाढत्या साखर दरामुळे अडचणीत आलेल्या ऊस शेतीला मिळणार जीवनदान?
सोलापूर : देशांतर्गत बाजारपेठेत साखरेच्या दराने उच्चांकी पातळी गाठल्याने साखर उद्योगात मोठी उलाढाल सुरू झाली आहे. घाऊक बाजारात साखरेच्या दरात कालच्या 65 रुपये दरामध्ये 4 रुपयांची वाढ झाली असून 69 रुपये किलो दराने खरेदी होत आहे. तर किरकोळ विक्री सुमारे ८० रुपये किलोपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, गुळाच्या दरातही मोठी वाढ झाली असून गूळ सध्या ७० ते ८० रुपये किलो दराने विकला जात आहे.
गेल्या तीन महिन्यांत साखरेच्या दरात तब्बल ४० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याने साखर बाजारात तेजीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटते उत्पादन, इथेनॉलचा वाढता वापर व येणारा सणांचा हंगाम या कारणांमुळे हे दर भडकले आहेत. साखरेच्या वाढत्या दराचा परिणाम आगामी काळात गुळाच्या बाजारावरही होण्याची शक्यता असून, गुळाचा दर शंभरी पार करणार का? याकडे बाजाराचे लक्ष लागले आहे.
ऊस उत्पादकांच्या आशा उंचावल्या
अल निनोच्या प्रभावामुळे पर्जन्यमानातील अनिश्चितता, पाण्याची कमतरता आणि उत्पादन खर्चातील वाढ यामुळे ऊस शेती तसेच साखर कारखानदारीसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत साखरेच्या दरात झालेली विक्रमी वाढ ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी काहीशी दिलासादायक ठरत आहे.
साखरेच्या वाढलेल्या दरामुळे आगामी गाळप हंगामात साखर कारखान्यांना चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे साखरेच्या वाढत्या बाजारभावाचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही मिळावा, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांना चांगला दर देण्याची मागणी
अल निनोच्या प्रभावामुळे अपुरा पाऊस , खताच्या वाढत्या किंमती व मजुरांची टंचाई यामुळे ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. आता साखरेच्या दराने उच्चांक गाठल्याने साखर कारखान्यांनी या वाढीचा फायदा ऊस उत्पादकांना देत शेतकऱ्यांना योग्य आणि समाधानकारक ऊस दर जाहीर करावा, अशी मागणी पुढे येत आहे.
साखरेच्या विक्रमी दरामुळे ऊस शेतीला पुन्हा आर्थिक बळ मिळणार का, याकडे सोलापूरसह राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.











