सोलापूर : पदमशाली समाजाचे कुलदैवत श्री महर्षी मार्कंडेय महामुनी यांच्या नारळी पौर्णिमा उत्सवाला श्री मार्कंडेय मंदिरात भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. नारळी पौर्णिमेनिमित्त पदमशाली समाजाच्या वतीने गेल्या १०० वर्षांपासून श्री महर्षी मार्कंडेय महामुनी यांचा रथोत्सव व मिरवणूक काढण्याची परंपरा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर श्री मार्कंडेय मंदिरात श्रींच्या उत्सव मूर्तीची पालखी प्रदक्षिणा काढण्यात आली.
उत्सवाच्या प्रारंभी महापौर विनायक कोंड्याल व त्यांच्या पत्नी धनश्री कोंड्याल यांच्या शुभहस्ते श्री महर्षी मार्कंडेय महामुनी यांचा विधिवत रुद्राभिषेक करण्यात आला. यानंतर श्रींच्या उत्सव मूर्तीच्या पालखीचे पूजन महापौर विनायक कोंड्याल व धनश्री कोंड्याल यांच्या हस्ते करण्यात आले. धार्मिक विधी पार पडल्यानंतर पालखीची मंदिर परिसरातून प्रदक्षिणा काढण्यात आली. यावेळी उपस्थित भाविकांनी ‘जय मार्कंडेय’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून टाकला.

नारळी पौर्णिमा उत्सवाला पदमशाली समाजामध्ये विशेष महत्त्व असून, श्री महर्षी मार्कंडेय महामुनी हे समाजाचे आराध्यदैवत मानले जाते. शतकभरापासून सुरू असलेली ही परंपरा आजही मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने जपली जात आहे. पालखी प्रदक्षिणेच्या वेळी मोठ्या संख्येने समाजबांधव व भाविक उपस्थित होते.



याप्रसंगी पदमशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, सचिव संतोष सोमा, उपाध्यक्ष महांकाली येलदी, उद्योजक मुरलीधर आरकाल, गणेश बुधाराम, पदमशाली युवक संघटनेचे अध्यक्ष ॲड. हेमंतकुमार साका, नगरसेवक विजय चिप्पा, नगरसेवक सिद्धेश्वर कमटम, नगरसेवक शेखर इगे, तुषार जक्का यांच्यासह पदमशाली समाजातील मान्यवर, महिला, युवक व मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.
दरम्यान, महापौर विनायक कोंड्याल आणि पदमशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांनी नारळी पौर्णिमा उत्सवाला सुरुवात झाली असल्याचे सांगितले. उत्सवानिमित्त पुढील सात दिवस श्री मार्कंडेय मंदिरात तेलुगू भाषेत ‘वचन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक कार्यक्रमात समाजबांधव व भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन श्री महर्षी मार्कंडेय महामुनींचे आशीर्वाद घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले.
दि. २८ ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्री महर्षी मार्कंडेय महामुनी यांचा भव्य रथोत्सव व मिरवणूक काढण्यात येणार असून, या रथोत्सवात समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पदमशाली ज्ञाती संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.











