सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील ग्रामीण भागात मागील दोन महिन्यांपासून एस टी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असल्याकारणाने ग्रामीण भागात लालपरिचे दर्शन सामान्य नागरिकांना झालेच नाहीं. याचा फटका तालुक्याच्या ठिकाणी कामानिमीत्त ये-जा करणाऱ्या नागरिकांना सोसावा लागत आहे. एस टी कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे विद्यार्थ्यांना शाळेत, महाविद्यालयात जाण्यास अडचण निर्माण होत आहे. खाजगी वाहनातून जीवघेणा प्रवास करून शाळा गाठताना काही विद्यार्थी दिसत आहेत. .
तसेच इतरही प्रवाशांना, नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असून आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत आहे. वेतनवाढीच्या मागणीवरून राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाला काही महिने लोटले आहेत, पण अद्यापही एसटी चालू झालेली नाही. या संपामुळे बाहेरगावी जाणे अवघड झाले आहे. प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामध्ये महिला, वयोवृद्ध, बालक, विद्यार्थी यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. लालपरी गेल्या ७४ वर्षापासून सर्वसामान्यांच्या सेवेत आहे. मुख्य:त ग्रामीण भागाची एसटी जनवाहिनी आहे.ह्या संपामुळे प्रवाशांचे अतोनात हाल सुरु झाले. पण या संपाचा फायदा खासगी वाहनांनी घेतला आहे. यामध्ये खाजगी वाहनांनी मोठ्या प्रमाणात भाडेवाढ केली आहे. ही भाडेवाढ दुप्पट तिप्पट प्रमाणात आहे, तसेच मर्यादेपेक्षा खूप जास्त प्रवाशांची ने-आण होत आहे. त्यामुळे प्रवाश्यांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. लवकरच एसटी कर्मचाऱ्यांनी एस टी चालू करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.