बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी सोलापूर -बीड या महामार्ग भूसंपादनात सुमारे 300 कोटी रुपयांचा घोटाळा केला. जादा रक्कम देणे चुकीचे आणि बोगस आदेश काढणे या प्रकरणात त्यांना अटक झाली असून ते सध्या जेलची हवा खात आहेत. अशाच पद्धतीचा घोटाळा सोलापूर जिल्ह्यात झाला आहे. सोलापूर -तुळजापूर- धाराशिव या नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गाच्या भूसंपादनात सुमारे 150 कोटी रुपयांची रक्कम जादा देण्यात आल्या प्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे अहवाल दिला आहे.
सोलापूर तालुक्यातील सेवालाल नगर, भोगाव, देगाव, मार्डी, बाळे परिसरात जमिनींची मोजणी व मोबदला प्रक्रिया राबविण्यात आली होती. या रेल्वे प्रकल्पाची अंदाजित किंमत सुरुवातीला सुमारे ₹९०४ कोटी होती; मात्र नंतर सुधारित अंदाजपत्रक ₹३,२९५ कोटींवर गेली त्यामुळे भूसंपादन खर्च आणि मोबदल्याच्या रकमांबाबतही प्रश्न उपस्थित झाले. यामध्ये काही दलालांना हाताशी धरून अधिकाऱ्यांनी चुकीचे अहवाल सादर करून जादा मावेजा दिला आहे. यामध्ये अनेक उपजिल्हाधिकारी तसेच तहसीलदार अडकणार आहेत. सध्या हे प्रकरण राज्याच्या मुख्य सचिवांकडे प्रलंबित आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी याबाबत आवाज उठवणे गरजेचे आहे. तरच अविनाश पाठक या आयएएस अधिकाऱ्याप्रमाणे प्रमाणे सोलापूर जिल्ह्यात कोट्यावधी रुपयाची माया कमविणारे प्रशासकीय अधिकारी जेलमध्ये जातील.










