मुंबई : स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी आपलं जलसमाधी आंदोलन तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आणि ही चर्चा सकारात्मक होती अशी माहिती रविकांत तुपकर यानी दिली. शेतकऱ्यांची वीज तोडणार नाही असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं असल्याचं ते म्हणाले. अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी या मागणीसाठी रविकात तुपकर हे आज अरबी समुद्रात जलसमाधी आंदोलन करणार होते.
रविकांत तुपकर यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, बऱ्याचशा मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. ज्या मागण्या आता मान्य करण्यात आल्या नाहीत त्यासाठी थोडा वेळ लागेल असं मुख्यमंत्री म्हणाले. बऱ्याचअंशी आमचं समाधान झाल्यानं आम्ही आज होणारं हे आंदोलन मागे घेत आहोत. पण राज्य सरकारने जर शब्द फिरवला तर मात्र पुन्हा एकदा आंदोलनाचं शस्त्र उपसलं जाईल. काही निर्णयांच्या मागण्यासंबंधी एक शिष्टमंडळ केंद्र सरकारला जाऊन भेटणार असल्याचं ते म्हणाले. कृषी कर्जाला सीबिलची अट लावली आहे, ती अट महाराष्ट्रात लावण्यात येणार नाही असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं असल्याची माहिती रविकांत तुपकर यांनी दिली.