लापूर दि.29:- जिल्ह्यामध्ये मागील आठवड्यापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांची पीके पाण्याखाली गेली आहेत. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दुरध्वनीव्दारे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडून पूरस्थितीची, पीक नुकसानीची माहिती घेतली.
ज्या ज्या ठिकाणी पूरस्थिती, अतिवृष्टी झाली आहे. सीना नदी काठच्या गावांना रेड अलर्ट जारी करण्याच्या सूचना देवून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन भरणे यांनी केले आहे. जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची झालेल्या नुकसानीची माहिती घेण्याची सूचना श्री. भरणे यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी शंभरकर यांनी जिल्ह्यातील पूरस्थितीची आणि आपत्ती व्यवस्थापनाची माहिती दिली. अक्कलकोट तालुक्यातील आंदेवाडी येथे सीना नदी आणि गावच्या ओढ्याच्या पुरामुळे या गावाचा सोमवार दि.27 सप्टेंबर पासून चारी बाजूनी संपर्क तुटला होता. या गावाची 1400 लोकसंख्या आहे . 10 रक्तदाबाचे रूग्ण, 25 रक्तदाब आणि मधुमेहाचे रूग्ण, 12 आस्थमाचे रूग्ण, पाच गरोदर महिलांपैकी नऊ महिन्याची एका गरोदर महिलाचा समावेश होता. जिल्हा प्रशासनाने तडीने गावामध्ये भारतीय रेल्वेच्या ट्रॉलीव्दारे मेडिकल युनिट पाठविले होते. गावात पोहचण्याचा रेल्वेपूल हाच एकमेव मार्ग होता. अतिबिकट परिस्थिती ओढावली असती तर रेल्वेच्या मदतीने नागरिकांना गावातून सुरक्षित ठिकाणी हालविण्याची योजना आखली होती. पंढरपूर नगरपरिषदेची बोट मागविली होती. आता त्या गावामध्ये परिस्थिती पूर्व पदावर आली असल्याची माहिती श्री. शंभरकर यांनी यावेळी दिली.
बार्शी तालुक्यात एक तर मोहोळ तालुक्यातील 29 गावांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बार्शी तालुक्यात 12 घरांचे, दक्षिण सोलापूर तालुक्यात तीन घरांचे, करमाळा तालुक्यात चार घरांचे , मंगळवेढा तालुक्यात तीन घरांची पडझड झाली आहे. 44 हजार 763 हेक्टर जिरायत क्षेत्र तर 2113 हेक्टर बागायत क्षेत्र बाधित झाले आहे. 29 हेक्टर फळपिकांचे क्षेत्र बाधित आहे.
जिल्ह्यासाठी पाच इंजिन बोटी मंजूर
जिल्ह्यात पूरपरिस्थिती ओढावली तर आपत्ती व्यवस्थापन कक्षाने राज्य शासनाकडे बोटीची मागणी केली होती. राज्य शासनाने जिल्ह्यासाठी पाच इंजिन बोटी मंजूर केल्या आहेत . आठवड्याभरात जिल्ह्याला त्या मिळतील, असे पालकमंत्री श्री. भरणे यांनी सांगितले.