गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे आणि कोकणवासीयांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे गणेशोत्सव.या गणेशोत्सवासाठी कोकणाकडे जाणाऱ्या लाखो गणेशभक्तांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या खासगी वाहनांना आणि एसटी बसेसना पथकरातून पूर्ण माफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच मुंबई-बंगळुरू मार्गावरून प्रवास करणाऱ्या गणेशभक्तांनाही टोलमाफीचा लाभ मिळणार आहे.सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी याबाबत माहिती दिली. गणेशभक्तांचा प्रवास सुरक्षित, सुलभ आणि सुरळीत व्हावा, तसेच गणेशोत्सवाच्या काळात महामार्गांवरील वाहतूक कोंडी कमी व्हावी, यासाठी विशेष नियोजन करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. या टोलमाफीचा लाभ मुंबई–बंगळूर महामार्ग (NH-48) आणि मुंबई–गोवा महामार्ग (NH-66) वरून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना मिळणार आहे. 11 सप्टेंबर पासून 27 सप्टेंबर 2026 या कालावधीत ही टोल माफी असणार आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) संबंधित मार्गांवरही गणेशभक्तांना टोलमाफीची सवलत लागू राहणार आहे.
अटल सेतूमार्गे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांनाही टोलमाफीचा लाभ मिळणार आहे.टोलमाफीचा लाभ घेण्यासाठी गणेशभक्तांसाठी स्वतंत्र पासची व्यवस्था करण्यात आली आहे. ‘गणेशोत्सव 2026 कोकण दर्शन’ असा स्टिकर किंवा पास उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या पासवर संबंधित वाहनाचा क्रमांक आणि चालकाचे नाव नमूद केलेले असेल. हे पास पोलीस स्टेशन, वाहतूक पोलीस चौक्या आणि RTO कार्यालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, कोकणात जाताना घेतलेला पास परतीच्या प्रवासासाठीही ग्राह्य धरला जाणार आहे. त्यामुळे गणेशभक्तांना परतीच्या प्रवासातही टोलमाफीचा लाभ मिळणार आहे.











