सोलापूर :- बिदर जिल्ह्यातील बसवकल्याण येथे येत्या ४ व ५ मार्च रोजी जागतिक लिंगायत महासभा आणि सर्व बसव तत्ववादी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या राष्ट्रीय लिंगायत महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे..
बाराव्या शतकात महात्मा बसवण्णा आणि अन्य शरणांच्या समग्र क्रांतिकारी आंदोलनाच्या माध्यमातून आणि महान त्याग व बलिदानातून उदयास आलेला विश्व मानवतावादी धर्म म्हणजे लिंगायत धर्म होय. लिंगायत हा एक स्वतंत्र धर्म असून समता, स्वातंत्र्य, श्रमप्रतिष्ठा, दासोह, सदाचार, एकदेवोपासना देहाची देवालय, स्त्री-पुरुष समानता, विवेकनिष्ठ आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आदी मूल्याचा पुरस्कार केला आहे . या दोन दिवशीय अधिवेशनात लिंगायत धर्म, साहित्य, संस्कृती व परंपरा याच्यावर चिंतन, मनन करण्यात येणार आहे. शिवाय लिंगायत समाजाची सद्यस्थिती आणि पुढील वाटचाल या संबंधी या विषयी निर्णायक भूमिका निश्चित करण्याच्या दिशेने या अधिवेशनाचे महत्त्व अधिक आहे.
विशेष म्हणजे २०१८ साली कर्नाटक सरकारने नेमलेल्या न्या. नागमोहनदास समितीने आपल्या अहवालात लिंगायत स्वतंत्र धर्म असल्याचा निष्कर्ष प्रसिद्ध केलेला असताना केंद्र सरकार या मागणी संबंधी मौन बाळगून आहे. यासंबंधी राज्य व केंद्र सरकारवर दबाव वाढविण्यासंबंधी पुढील रणनीती आखण्यात येणार आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन मा. न्यायमूर्ती नागमोहन दास यांच्याहस्ते संपन्न होणार असून, त्यांचे मौलिक मार्गदर्शन लाभणार आहे. अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ विचारवंत डॉ.गो.रू. चनबसप्पा यांची निवड करण्यात आली आहे. या अधिवेशनात २०० हुन अधिक मठाधीश, धर्मगुरू उपस्थित राहणार आहेत. तसेच देशाच्या विविध राज्यातून व विदेशातून हजारो लिंगायत बांधव येणार आहेत अशी माहिती जागतिक लिंगायत महासभेचे राष्ट्रीय प्रधान कार्याध्याक्ष श्री. जी. बी. पाटील बेंगलुरू यांनी दिली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील लिंगायत बांधवांनी अधिकाधिक संख्येने या महाअधिवेशनात सहभागी व्हावे असे आवाहन जागतिक लिंगायत महासभा समन्वयक राजशेखर तंबाके यांनी केले. यावेळी कलबुर्गी जागतिक लिंगायत महासभा जिल्हाध्यक्ष प्रभुलिंग महागांवकर, समन्वयक विजयकुमार हत्तुरे, बसवकेंद्राचे अध्यक्ष शिवशंकर काडादी, ज्ये. साहित्यीका सिंधूताई काडादी, साहित्यीक चन्नवीर भद्रेश्वरमठ, प्रदिप वाले, विजय काडादी, मल्लिकार्जुन मुलगे, सकलेश बाबुळगांवकर, नामदेव फुलारी,चन्नप्पा गुरुभेट्टी, रवींद्र बुकटे, सिद्रामप्पा सलगर, श्रीशैल कोठावळे, वैभव मसरे, जीनगोंडा पाटील आदी उपस्थित होते.