मुंबई : आजचा दिवस महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे प्रथमच अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आज दुपारी 2 वाजता विधानसभेत अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प सादर करणार आहेत. तर विधानपरिषदेमध्ये मंत्री दीपक केसरकर हे अर्थसंकल्प सादर करणार आहेत. राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही, त्यामुळं राज्य अर्थमंत्री नसल्यानं दीपक केसरकर हे अर्थसंकल्प मांडणार आहेत.
आगामी काळातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून घोषणांचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. पण पहिल्यांदाच अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस या सर्वांचा मेळ कसा घालतात आणि अर्थसंकल्पातून सर्व क्षेत्रांना कशा पद्धतीनं दिलासा देणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.
दुपारी 1 वाजता कॅबिनेटची बैठक होणार आहे. त्यामध्ये अर्थसंकल्पाला मंजुरी मिळणार आहे. तर दुपारी 2 वाजता विधानसभेत अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्याचवेळी ग्रामीण आणि शहरी भागांमधील समतोल साधला जाणार का? याकडेही सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
सध्या हवामानातील बदलामुळं राज्यातील विविध भागात अवकाळी पावसानं जोर धरल्याचं पाहायला मिळतंय. यामध्ये विविध भागातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. त्यामुळं या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांसाठी नक्की काय मिळणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.
राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये आर्थिक प्रगतीचा अहवाल मंदावल्याचा दिसत आहे. त्यामुळं कृषी, उद्योग, सेवा क्षेत्रांमध्ये सरकार कसा समतोल राखणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.