येस न्युज मराठी नेटवर्क । भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाला इंग्लंडकरुन ६ विकेट्सनी दारुण पराभवाचा सामना करावा लागला. टीम इंडियाने दिलेले ३३७ धावांचे विशाल आव्हान इंग्लंडने जॉनी बेअरस्टोच्या शानदार शतकासह बेन स्टोक्स आणि जेसन रॉयच्या आक्रमक अर्धशतकांच्या जोरावर फक्त चार फलंदाजांच्या मोबदल्यात आणि ३९ चेंडू राखून पार केले आणि दिमाखदार विजय साजरा केला.
या सामन्यात भारतीय संघाच्या पाचही गोलंदाजांनी इंग्रज फलंदाजांसमोर गुडघे टेकल्याचं बघायला मिळालं. तरीही कर्णधार विराट कोहलीने सहावा गोलंदाज म्हणून हार्दिक पांड्याकडे चेंडू सोपवला नाही. त्यामुळे क्रिकेटप्रेमींसह अनेक माजी दिग्गज क्रिकेटपटूंच्याही भुवया उंचावल्या. सामना संपल्यानंतर झालेल्या प्रेझेंटेशनमध्येही कोहलीला पांड्याला गोलंदाजी न देण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला.
त्यावर, येत्या काही महिन्यात भारतीय संघाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे हार्दिकला गोलंदाजी न देण्याचा निर्णय घेतल्याचं विराटने सांगितलं. “आम्ही टी-२० मालिकेत त्याच्या गोलंदाजीचा वापर केला, पण हे थोडंफार वर्कलोड मॅनेजमेंटप्रमाणे आहे. हार्दिक आमच्या संघातील मह्त्त्वाचा भाग आहे, त्यामुळे त्याच्या फिटनेसची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. फलंदाजीसोबतच त्याच्या गोलंदाजीतील कौशल्याची कुठे गरज आहे हे समजून घेणं गरजेचं आहे”, असं कोहली म्हणाला.