मोहोळ पोलीस स्टेशन, सोलापूर येथे गु.र.क्र. ६५७/२०२२ अन्वये आरोपी क्र.१ रमजान ताजोद्दीन मुलानी (वय ४३ वर्षे) व आरोपी क्र.२ चांदबी रमजान मुलानी (वय ३९ वर्षे), दोघेही रा. तारापूर, ता. पंढरपूर, जि. सोलापूर यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता, १८६० चे कलम ४९८-अ, ३०६ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर प्रकरणातील मयत व्यक्ती मरजीना हिचे आरोपी क्र.१ रमजान ताजोद्दीन मुलानी याच्यासोबत सन २०२० मध्ये विवाह झाला होता. आरोपी क्र.१ याचा यापूर्वी विवाह झालेला असून त्यास पहिल्या पत्नीपासून अपत्ये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले होते. विवाहानंतर मयत मरजीना ही तिच्या पतीसोबत तारापूर येथे राहत होती.
फिर्यादी उमर अब्बास शेख यांच्या फिर्यादीनुसार, आरोपी रमजान मुलानी व त्याची पहिली पत्नी चांदबी रमजान मुलानी हे मयत मरजीना हिला घरगुती कारणांवरून त्रास देत, शिवीगाळ व मारहाण करीत तसेच माहेरून ६०,०००/- रुपये घेऊन येण्याची मागणी करीत. या त्रासामुळे मरजीना हिला एप्रिल २०२१ मध्ये तिच्या माहेरी मोहोळ येथे आणून सोडण्यात आले होते. त्यानंतर दिनांक १२ जून २०२१ रोजी आरोपी रमजान हा मोहोळ येथील फिर्यादीच्या घरी आला असता त्याने पैसे जुळवले का नाहीत, असे विचारणा करत मरजीना हिला शिवीगाळ केली. तदनंतर मयत मरजीना हिने महिला तक्रार निवारण केंद्र, सोलापूर येथे तक्रार केली होती तसेच मोहोळ येथील न्यायालयातही प्रकरण दाखल केले होते. त्यावेळी आरोपींनी मरजीना हिला चांगले वागवून सांभाळण्याबाबत लेखी म्हणणे दिल्यानंतर तिला पुन्हा आरोपींसोबत नांदण्यासाठी पाठविण्यात आले होते.
मात्र, दिनांक २१ फेब्रुवारी २०२२ रोजी आरोपींनी माहेरून पैसे आणण्याच्या कारणावरून मयत मरजीना हिला मारहाण, शिवीगाळ व दमदाटी करून घराबाहेर काढल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर ती तारापूर येथून मोहोळ येथे आपल्या वडिलांकडे आली होती. सदर घटनेच्या अनुषंगाने दिनांक २३फेब्रुवारी २०२२ रोजी तिच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मरजीना ही आपल्या वडिलांसोबत मोहोळ येथे राहत होती. दिनांक १६ जून २०२२ रोजी सायंकाळी सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास, घरातील लोखंडी अँगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन मयत मरजीना हिने आत्महत्या केल्याचे पोलिस तपासात समोर आले. सदर घटनेनंतर फिर्यादी उमर अब्बास शेख यांनी आरोपी रमजान ताजोद्दीन मुलानी व चांदबी रमजान मुलानी यांच्याविरुद्ध तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करत तक्रार दिली होती. त्यानुसार दिनांक ०६/०८/२०२२ रोजी गुन्हा सदर आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.
पोलिसांनी तपास पूर्ण करून दिनांक ०६ ऑक्टोबर २०२२ रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदर प्रकरण सत्र खटला क्र. ३०७/२०२२ म्हणून सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात चालविण्यात आले. खटल्यातील पुरावा दिनांक ०८ डिसेंबर २०२५ पासून सुरू झाला.
सदर खटल्यात आरोपीतर्फे ॲड. कदीर औटी यांनी असा युक्तिवाद केला की, सरकार पक्षाने कलम ४९८-अ व ३०६ अन्वयेचे आरोप संशयाच्या पलीकडे जाऊन सिद्ध केलेले नाहीत. केवळ वैवाहिक वाद किंवा मयत महिलेने आत्महत्या केली म्हणून आरोपींनी तिला आत्महत्येस प्रवृत्त केले, असे मानता येत नाही. आत्महत्येस प्रवृत्त केल्यासाठी आरोपींकडून ठोस कृती, हेतू किंवा जाणीवपूर्वक केलेले कृत्य सिद्ध होणे आवश्यक आहे. सदर प्रकरणात आरोपींच्या कोणत्याही विशिष्ट कृतीमुळे मृतकेने आत्महत्या केली, याबाबत स्वतंत्र, ठोस व विश्वासार्ह पुरावा सरकार पक्षास सादर करता आला नाही. तसेच आरोपी क्र. २ चांदबी मुलानी हिच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करण्यासाठी केलेली विशिष्ट कृतीही सिद्ध झालेली नाही. त्यामुळे आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात यावे, असा युक्तिवाद बचाव पक्षातर्फे करण्यात आला.
सरकार पक्षाने फिर्यादीसह संबंधित साक्षीदार, तपासिक अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व इतर पुरावे न्यायालयासमोर सादर केले. मात्र, आरोपींकडून मयत मरजीना हिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यात आले किंवा आरोपींनी जाणीवपूर्वक तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त अथवा मदत केली, ही बाब आवश्यक त्या कायदेशीर निकषांनुसार संशयाच्या पलीकडे सिद्ध करण्यात सरकार पक्षास यश आले नाही.
दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून व खटल्यातील संपूर्ण पुराव्यांचे अवलोकन केल्यानंतर, सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाचे मा. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. डी. इंदलकर साहेब यांनी दिनांक ०८ सप्टेंबर २०२६ रोजी दिलेल्या न्यायनिर्णयात सरकार पक्ष आरोपींविरुद्धचे आरोप सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याने आरोपी क्र. १ रमजान ताजोद्दीन मुलानी व आरोपी क्र. २ चांदबी रमजान मुलानी यांची भारतीय दंड संहिता, १८६० चे कलम ४९८-अ, ३०६ व ३४ अंतर्गत गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली.
वरील प्रकरणात आरोपीतर्फे ॲड. कदीर औटी*, ॲड. वैभव बोंगे, ॲड. ओंकार फडतरे, ॲड. शिवरत्न वाघ, ॲड. मोहीम पठाण, ॲड. मनिष बाबरे, ॲड. रोहित थोरात, ॲड. अजय वाघमारे, ॲड. त्वरिता वाघ, ॲड. भाग्यश्री जगदाळे, ॲड. पैगंबर सय्यद, ॲड. सलामत पटेल, ॲड. संकेत पवार, ॲड. प्रदिप गायकवाड, ॲड. सागर स्वामी आणि तौहीद मुलानी यांनी काम पाहिले, तर सरकार पक्षातर्फे ॲड. वी. एन. देशपांडे यांनी काम पाहिले.










