येस न्यूज नेटवर्क : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्याचे लक्ष लागून असलेली स्वाभिमानी शेतकरी संघटनेची २५ वी “ऊस परिषद ” १० ऑक्टोबर २०२६ रोजी जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर होणार असल्याची घोषणा संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. आगामी ऊस गाळप हंगामातील एफआरपीची पहिली उचल आणि ऊस उत्पादकांच्या विविध मागण्यांबाबत संघटनेची पुढील भूमिका या परिषदेत निश्चित होणार आहे.
यंदा राज्य सरकारने १५ ऑक्टोबरपासून ऊस गाळप हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अपरिपक्व उसाची तोडणी झाल्यास ऊसाचे एकरी उत्पादन व साखरेची रिकव्हरी कमी होउन कारखानदार व शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची जास्त शक्यता असून याला संघटनेने पूर्वीच विरोध केला असून याबाबत पुढची भूमिका काय घेतली जाणार याकडे शेतकरी व कारखानदार दोघांचे लक्ष लागून राहिले आहे.
ऊस दरावर होणार चर्चा.
आगामी हंगामातील शासनाची एफआरपी, तोडणी व वाहतूक खर्च यासोबत साखरेचा किमान विक्री दर आणि इथेनॉलचा दर यामुळे यंदा ऊसदर किती वाढवून मागणी केलीजाते हे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे. तसेच ऊस तोडणी-वाहतूक दर अंतरानुसार निश्चित करणे आणि कारखान्यांतील वजनकाटे डिजिटल व ऑनलाइन करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
“ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या घामाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी दरवर्षी ऊस परिषद दिशा ठरवत आली आहे. यंदाची २५ वी परिषद शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी अधिक आक्रमक ठरेल. १० ऑक्टोबर रोजी जयसिंगपूरच्या विक्रमसिंह क्रीडांगणावर ऊस उत्पादक शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.”
राजू शेट्टी.
स्वाभिमानी शेतकरी संघटना.










