सात महिन्यांचा वाढलेला ऊस कापून चोरट्यांनी केला ८८ हजार रुपयांचा लंपास; दोन जणांना अटक
सोने दागिने पैसे चोरीला गेल्याच्या अनेक घटना सर्रास घडत असतात. पुण्यातून मात्र चक्क शेतातील ऊस चोरीला गेल्याची घटना चर्चेचा विषय बनली आहे. सणासुदीच्या काळात साखरेच्या दरात वाढ होत असतानाच ऊसाची डिमांड वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर हवेली तालुक्यातील आष्टीपूर येथे शेतातून तब्बल ४० टन ऊस चोरून नेण्यात आला.
मुंढवा येथे गेलेल्या कुटुंबाच्या शेतावर डल्ला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अनिल नंदकुमार कामठे यांच्या कुटुंबाची आष्टीपूर येथे गट क्रमांक ८२२ मध्ये शेती आहे. कामठे कुटुंबीय १९ ते २३ ऑगस्टदरम्यान मुंढवा येथे गेले होते. याच काळात अज्ञात व्यक्तींनी संधी साधत त्यांच्या शेतातील सात महिन्यांचा वाढलेला ऊस कापला आणि तो परस्पर घेऊन गेले.सात महिन्यांचा वाढलेला ऊस कापून चोरट्यांनी तब्बल ८८ हजार रुपयांचा ऊस लंपास केला.
लोणी काळभोर पोलिसांची कारवाई
या प्रकरणी तक्रार मिळाल्यानंतर लोणी काळभोर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेत त्यांच्यावर कारवाई केली आहे.
एकीकडे उत्पादन खर्च, मजुरी आणि पाण्याचा प्रश्न; तर दुसरीकडे तयार झालेला ऊसच चोरीला जाण्याची वेळ आल्याने शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.











