कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण करून परतीच्या प्रवासात तिबेटमधील सागा येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील ३७ भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तातडीच्या पुढाकारानंतर हे सर्व भाविक आज सकाळी ६ वाजता सागा येथून न्यालम चेक पोस्टमार्गे काठमांडूकडे सुखरूप रवाना झाले आहेत.
ठाणे, पुणे, अलिबाग, रायगड आणि डोंबिवली परिसरातील हे ३७ भाविक कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेले होते. परतीच्या प्रवासादरम्यान ते सागा येथे अडकले होते. भाविकांचे काठमांडूहून परतीचे विमान २९ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता नियोजित असल्याने त्यांना वेळेत काठमांडू गाठणे आवश्यक होते.
या परिस्थितीची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी संपर्क साधला. त्यानंतर आवश्यक सहकार्य मिळाल्याने सर्व भाविकांचा सागा ते काठमांडू सुरक्षित प्रवास सुरू झाला आहे.
संकटाच्या काळात तातडीने मदत मिळाल्याबद्दल भाविकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे आभार मानले आहेत.










